प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणीसाठी बुधवारी वंचित बहुजन आघाडी तर्फे रत्नागिरीत ‘डफली बजाओं’ आंदोलन केले.
25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाय योजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादि ज्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले. या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता अंदाजे 80 टक्के लोकांनी दाखवली आहे. 15 टक्के लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन करोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. 5 टक्के लोक वुलनेरेबल आहेत. हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही ही नियंत्रणात आणता येत नाहीत वैद्यकीय दृष्टय़ा गंभीर होत आहेत वा बळी पडत आहेत.
सरकारने 20 टक्के लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे हे सूत्र ठेवले पाहिजे. 100 टक्के लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे.
कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे ? सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत परंतु त्या फारच अपुऱया आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. त्यासाठी येथील एसटी डेपोसमोर हे आंदोलन बुधवारी करण्यात आले. त्यावेळी तालुका अध्यक्ष सुशिल जाधव, उपाध्यक्ष योगेश झोरे, महासचिव मुकुंद सावंत, जिल्हा सहसचिव सिद्धार्थ सावंत. जिल्हा सदस्य अगबर काझी, संघटक सुधिर कदम, कपिल कांबळे, विशाल जाधव्। अमोल सावंत, महेंद्र जाधव, मनोज जाधव, समीर जाधव, सुशांत सावंत हे उपस्थित होते.