वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
भारत सार्वभौमत्वाच्या मुद्यावर अत्यंत गंभीर आहे आणि ते कायम राखण्यासाठी देश सर्व प्रकारच्या आकस्मिक परिस्थितीसाठी तयार आहे, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना स्पष्ट केले. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनबरोबरच्या सध्याच्या तणावावर शांततेने तोडगा काढण्यास भारत वचनबद्ध आहे परंतु चीनचे एकतर्फी स्थिती बदलण्याचे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वारंवार केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर चीनला दिलेला कडक इशारा म्हणून या निवेदनाकडे पाहिले जाते. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागांमध्ये सैन्याच्या अनेक सैन्य तुकडय़ा तैनात केल्या आहेत आणि दारूगोळा, शस्त्रे आणलेली आहेत. पूर्व लडाख, गोगरा, कोंगका ला, पँगाँग तलावाचे उत्तर व दक्षिण काठ असे बरेच संघर्षाचे बिंदू आहेत. भारतीय सैन्याने या भागात आवश्यक प्रमाणात तुकडय़ा तैनात केल्या आहेत, असे सिंह यांनी सांगितले. भारतीय संरक्षण दले या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जातील हा विश्वास सभागृहाने बाळगावा, असे ते म्हणाले.
चीनला सीमा अमान्य
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत भारत व चीन यांचे दृष्टिकोन वेगवेगळे चिनी सैन्याच्या हिंस्र कृती म्हणजे मागील सर्व करारांचे उल्लंघन आहे. भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी व त्यांना प्रत्युत्तर म्हणून त्या ठिकाणी वाढीव सैन्य तैनात केले आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमाप्रश्न सुटलेला नसून आतापर्यंत दोघांनाही स्वीकारार्ह असा कोणताच तोडगा निघालेला नाही. चीनला सीमा मान्य नाही.
चीन सीमेचा मान राखत नाही. ही सीमा करारांनीच निश्चित केलेली नाही, तर ऐतिहासिकदृष्टय़ा राखली गेलेली आहे. तथापि, चीनला असे वाटत आहे की, सीमा स्पष्ट केलेली नाही. पण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कोणतीही गंभीर परिस्थिती द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करेल. हा सीमाप्रश्न गुंतागुंतीचा असून शांततापूर्वक तोडगा काढण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये अनेक करार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
निश्चयाविषयी शंका नसावी
सीमेवरील सध्याचा प्रश्न शांततामय चर्चा व सल्लामसलतीद्वारे सोडविण्यास भारत वचनबद्ध आहे. त्यासाठी आपण मॉस्को येथे चिनी संरक्षणमंत्री जनरल वेई फेन्ग यांना भेटलो आणि सखोल चर्चा झाली. त्यात आपण स्पष्ट केले की, भारत हा प्रश्न शांततापूर्णरीत्या सोडवू इच्छित आहे आणि चीनने आमच्याबरोबर कार्य करावे अशी इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या आमच्या निश्चयाबद्दलही शंका नसावी, असे राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले.
शांततेने तोडगा काढण्यास वचनबद्ध
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये चिनी परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनीही अशीच भूमिका घेतली. यापूर्वी चीनबरोबरच्या सीमेच्या भागात बऱयाच समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या शांततापूर्णरीत्या सोडविल्या गेल्या. यावेळची परिस्थिती फार वेगळी आहे. तरी आम्ही सध्याच्या परिस्थितीवर शांततेने तोडगा काढण्यास वचनबद्ध आहोत. त्याचबरोबर आम्ही कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहोत, असे सिंह यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी भाष्य केल्यानंतर या विषयावर चर्चा करण्यास मान्यता दिली न गेल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.