2020-21 मधील शैक्षणिक वर्षावर देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावरच शिक्षण देणे भाग पडल्यानंतर निदान 2021-22 या वर्षात तरी शिक्षण संस्थांची कवाडे उघडली जाणार ही शक्मयताच मावळत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेचा उदेक पहिल्यापेक्षाही भीषण व तीव्र असल्याने शैक्षणिक परिस्थितीही तशी भयावहच आहे. शिक्षणाच्या ऱहासाबरोबरीनेच विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यही बिघडत चालल्याने शिक्षणाशिवायच पदवी-पदविका मिळतील खरे, पण प्रत्यक्षात अशा शिक्षणाचा लाभ किती होईल याचे उत्तर मिळविणे कठीण आहे.
साल 2010 मध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान (एज्युकेशन टेक्नॉलॉजी किंवा ‘एज्युटेक’) स्टार्टअप्स्ने भारतीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळविला असला, तरी त्यांच्या उपयोगितेच्या दृष्टीने होणारे चांगले परिणाम 2020-21 च्या शैक्षणिक वर्षात जाणवले. गेल्या शैक्षणिक वर्षातील झालेल्या शैक्षणिक नुकसानीची पूर्तता भरून काढण्यासाठी भारतातील शिक्षण क्षेत्रात एज्युटेक स्टार्टअप्स्नी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माहिती-तंत्रज्ञान आधारित भौतिक वर्गांच्या तुलनेत शिक्षण देताना एज्युटेक कंपन्यांनी पायाभूत सुविधांची गरज दूर केली. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुसंगतता आणली व शिक्षणाचा प्रसार सक्षम केला, यात वाद नसावा.
केपीएमजी इंडिया यांनी जाहीर केलेल्या एका अभ्यासानुसार ‘ऑनलाईन एज्युकेशन इन इंडिया 2021’ या अहवालात देशातील ऑनलाईन शिक्षणव्यवस्थेत झालेली संख्यात्मक वाढीची नोंद जाणवते. साल 2016 ते 2019 दरम्यान भारतात पैसे मोजून ऑनलाईन शिक्षण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या 15 लक्षपासून वाढत 95 लक्षपर्यंत पोहोचली. अंदाजे याच काळात या प्रणालीत शिक्षण देणाऱया कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या गुंतवणुकीत 2 अब्ज अमेरिकन डॉलरपासून वाढ होत 522 अब्जापर्यंत रक्कम जमा केली. आता देशात कोविडची दुसरी लाट आल्यानंतर ऑनलाईन शिक्षणाचा बाजार पुढील दोन ते तीन वर्षांत आठपटींनी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
‘एज्युकॉप’ या नावाने चालणाऱया अशाच एक ऑनलाईन शिक्षण देणाऱया कंपनीने या क्षेत्रात प्रचंड नाव कमावले. 1994 साली स्थापन झालेल्या या कंपनीने देशातील खेडय़ापाडय़ातील शिक्षकांना माहिती-तंत्रज्ञान प्रणाली आत्मसात करण्यात खूप मदत केली. याच बरोबरीने 2020-21 सालात ‘बायजू’ ही कंपनी देशातील लोकप्रिय व ‘मूल्यवान’ बनली. (गुंतवणूकदारांच्या अर्थाने). या दोन्ही कंपन्यांनी मागील एका वर्षात अनेक कंपन्यांना आपल्याशी कडक स्पर्धा करून आपली क्षमता वाढविण्यास भाग पाडले.
एज्युकॉप व बायजू या कंपन्यांशी खऱया अर्थाने स्पर्धा केली ती ‘अपग्रेड’ या स्टार्टअप्ने. गेल्या वर्षातील टाळेबंदीनंतर त्यांच्या ग्राहक संख्येत दुपटीने वाढ झाली. 2015 सालात स्थापन झाल्यानंतर मार्च 2020 पर्यंत अपग्रेडने 5 लक्ष व्यावसायिकांना आपल्या व्यासपीठावरून शिक्षण दिले होते. पण एप्रिल 2020 नंतर व डिसेंबर 2020 च्या काळादरम्यान 10 लक्ष विद्यार्थी संख्या अपग्रेडने मिळविली. यात सर्व काही आले. याच काळादरम्यान ‘एज्युटिंकर’, ‘क्लास प्लस’, ‘वेदान्तु’ व ‘क्मयू शाला’ या एज्युटेक कंपन्या फारच लोकप्रिय झाल्या व कठीण परिस्थितीत शिक्षण घेण्यासाठी यशस्वीरीत्या मदत केली.
कोविड पूर्वकाळात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणप्रणाली अंतर्गत फक्त भाषा, गणित व विज्ञान या विषयांपुरतीच व्याप्ती व पसंती दर्शविली होती. आता मात्र वेगवेगळे स्टार्टअप्स् नाविन्यपूर्ण विषयांचा अंतर्भाव करत सर्जनशील व कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना भविष्यकाळातील संधींच्याबाबतीत विस्तीर्ण क्षितिजे मिळावीत, त्यांच्या फावल्या वेळात त्यांना वास्तविक व उपयुक्त शिक्षण देण्यावर अशा स्टार्टअप्स्नी भर दिला आहे. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ‘बांबिनोस लाईव्ह’, ‘एसपीटी रोबोटिक्स’ व ‘केवायटी’सारख्या नव्या युगाशी सुसंगत अशा शिक्षणापलीकडील शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण व व्यावहारिक प्रवाह मोकळे केले.
कोविडची प्रकरणे पूर्वीपेक्षाही अधिक वेगाने देशात वाढत असता येत्या काळातही विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्टय़ा सक्षम शिक्षण देण्यावर एज्युटेक स्टार्टअप्स्चा भर असावा. या निराशाजनक काळात तरुणांना त्यांची कौशल्ये वाढविण्यात व मेंदूच्या सक्रिय विकासासह दैनंदिन जीवनात उपयोगात येऊ शकणारे शिक्षण देण्यावर भर असावा. समाजातील उच्च उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांबरोबरच गरीब विद्यार्थ्यांनाही परवडेल असे शिक्षण या कंपन्यांनी द्यावे, अशी अपेक्षा आहे. ‘कॉन्वेजिनियस’, ‘थिंकझोन’, ‘क्रिएटिव्ह लॅब्ज’ व ‘एज्युऑरा’सारख्या कंपन्यांनी ग्रामीण भागातील इच्छुकांना तंत्रज्ञान आधारित सुलभ शिक्षण देण्याबाबत जलदगतीने कृती केली, ते खूपच कौतुकास्पद ठरावे.
एकीकडे एज्युटेक कंपन्या मिळालेल्या संधीचे सोने करण्यात व्यस्त असताना विद्यार्थ्यांनी आता शिक्षणाकडे आशेने लक्ष देण्याची गरज असावी. ऑनलाईन शिक्षणप्रणाली अंतर्गत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी कमी पडतात, असे प्रत्यक्षात दिसते. ऑनलाईन शिक्षणप्रणाली अंतर्गत पूर्ण लक्ष देऊन अभ्यास आत्मसात करण्याचे सोडून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी थकवा, डोळय़ांना त्रास, अनुत्साह, नेटवर्क नाही अशी कारणे देत पाटय़ा टाकत आहेत. शालेय विद्यार्थी ऑडियो-व्हीडिओ बंद ठेवून ऑनलाईन वर्गांना हजेरी लावणे व शिक्षकांनी आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनसमोर निस्तेज, रटाळ पद्धतीने व्याख्याने देणे नित्याचे झाले आहे.
कुठल्याही एका विषयात ऑनलाईन पद्धतीने शिकविणे 30 मिनिटांपेक्षा जास्त नसावे. दिवसाला चारपेक्षा जास्त शिकवण्याची सत्रे नसावीत, ही ऑनलाईन शिक्षणप्रणालीची मार्गदर्शक तत्त्वे असतानाही शाळा-महाविद्यालयांकडून सर्रास यांची पायमल्ली केली जाते, हे दुर्दैवी आहे. ऑनलाईन शिक्षणप्रणालीद्वारे शिक्षण घेण्यात भारतातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस नसतो तो यामुळेच. आज देशातील किमान 60 टक्के विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीवर नाराज आहेत. शिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी व प्रत्यक्षातील शैक्षणिक अनुभूतीबाबत देशातील शाळा-महाविद्यालयांनी चालविलेले ऑनलाईन शिक्षण नकारात्मक आहे, अशी सर्रास भावना बनत चालली आहे. अशा शाळा-महाविद्यालयीन शिक्षकांनी एज्युटेक कंपन्या वापरत असलेल्या प्रणालींचा लाभ घेणे उपयुक्त ठरावे. कोविडमुळे गेल्या वषीच्या शैक्षणिक वर्षावर पाणी ओतले असून 2021-22 हे वर्षही वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. साल 2020-21 मध्ये आपल्या शिक्षण प्रसारणात अचानक, नाटय़मय व असंभव असे बदल झाले. अनंत अडचणींना तोंड देत आपण हे बदल पचवले, आत्मसात केले. आता गरज आहे ही प्रक्रिया सुलभ बनविण्याची. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये हे बदल सुखकर होवोत, अशी अपेक्षा करूया.
डॉ. मनस्वी कामत