केदार नाईक यांच्याकडून साळगावकरांचा 1855 मतांनी पराभव
प्रतिनिधी /पर्वरी
साळगाव मतदार संघ हा भाजप पक्षाला अनुरूप असा मतदारसंघ आहे. तरी सुद्धा भाजपचे उमेदवार जयेश साळगावकर यांना पराभव सामोरे जावे लागले आहे. याची राज्य भाजप कार्यकारणीने कारणमिमांसा शोधणे आवश्यक आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे केदार नाईक या नवख्या उमेदवाराने विद्यमान आमदार आणि काही काळ मंत्री असलेले जयेश साळगावकर यांचा जवळ जवळ 1855 मतांनी पराभव केला आहे. नाईक यांना 9576 मते मिळाली तर जयेश साळगावकर यांना 7721 मिळाली आहेत.
जवळ जवळ पंधरा वर्षांनी काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात यश मिळाले आहे. भाजपने 2007 आणि 2012 मध्ये सलग दोन वेळा या मतदारसंघात विजय मिळविला होता तर 2017 मध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाचे साळगावकर विजयी झाले होते. राज्य कार्यकारणीने या वेळेस भाजप नि÷ावंत कार्यकर्त्यांना डावलून गोवा फॉरवर्ड पक्षाचे साळगावकर यांना उमेदवारी दिली हे पराभवाचे प्रमुख कारण आहे. आमच्यातील एकाला उमेदवारी जाहीर करावी असे स्थानिक भाजप मंडळाचे मत होते, परंतु पक्षाने त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांच्यावर साळगावकर रूपाने अन्य पक्षातील उमेदवार त्यांच्यावर लादला. त्याचा परिणाम स्थानिक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात बंड पुकारले व ‘टुगेदर फॉर साळगाव’ या बॅनर खाली एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या केदार नाईक यांना पाठिंबा जाहीर केला व जोरात कामही सुरु केले. त्यामुळे केदार नाईक विजयी झाले आहेत.
आरजीला भविष्यात अच्छे दिन...
या मतदारसंघात अन्य पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना रिव्होल्युशनरी गोवन्स या स्थानिक पक्षाने संपूर्ण गोव्याप्रमाणे या मतदारसंघात आपले अस्थित्व दाखविले आहे. या पक्षाचे उमेदवार रोहन कळंगुटकर यांनी 1928 मते मिळविली आहेत. दोन वेळचे जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक (अपक्ष) यांना अवघी 805 मते मिळाली आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की रिव्होल्युशनरी गोवन्स हा पक्ष आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे. या पक्षाने संपूर्ण गोव्यात जवळ जवळ नव्वद हजार मते मिळविली आहेत. भविष्यात त्यांचे भविष्य उज्वल असल्याचे सिद्ध होत आहे.
आप, तृणमूलला अपयश
या निवडणुकीत आप आणि तृणमूल या पक्षाची डाळ शिजली नाही. भोलानाथ घाडी (तृणमूल) यांना 352 तर आपचे मरिओ कार्देरो यांना 847 मते मिळाली आहेत. भंडारी समाजाचे वर्चस्व असलेला हा मतदारसंघ असल्याने भाजपच्या विचारसरणीशी मिळताजुळता आहे. त्यामुळे राज्य कार्यकारणीने उमेदवार निवडताना खूप दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पदरी अपयश पडणार नाही.