‘टुगेदर फॉर साळगाव’ मंचची स्थापना : वेरे येथे जाहीर सभेद्वारे घडविले शक्तिप्रदर्शन, केदार नाईक किंवा रुपेश नाईक उमेदवार
प्रतिनिधी /म्हापसा
साळगाव मतदारसंघातील माजी भाजप मंडळ आणि भाजप कार्यकर्ते एकत्र आले असून ‘टुगेदर फॉर साळगाव’ मंच तयार केला आहे. साळगावातून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले असून भाजपवासी झालेल्या जयेश साळगांवकर यांना त्यांनी आव्हान दिले आहे. रेईश मागूशचे सरपंच केदार नाईक व जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक या दोन नावांचा प्रस्ताव उमेदवारीसाठी पुढे आला असून त्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे. साळगावकर यांचा या निवडणुकीत दारुण पराभव करु, असा निर्धार जाहीर सभेत करण्यात आला आहे.
काल रविवारी वेरे येथे ‘टुगेदर फॉर साळगाव’ मंचची मोठी जाहीरसभा झाली. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात दाखल झालेल्या जयेश साळगांवकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये. केदार नाईक किंवा रुपेश नाईक यांच्यापैकी एकाला या मंचतर्फे निवडणुकीत उतरविण्यात येणार असून त्यात साळगावकर यांचा दारुण पराभव करण्याचा निर्धार करण्यात आला. या प्रकरणामुळे साळगाव भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जाहीरसभेच्या व्यासपीठावर गिरीचे पंच फोंडू नाईक, पिळर्णचे पंच अजय गोवेकर, जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक, रेईश मागुशचे पंच केदार नाईक, पिळर्णचे सरपंच संदीप बांदोडकर, नेरुलच्या पंच शशिकला गोवेकर, सांगोल्डाचे पंच शशिकांत नाईक, ज्येष्ठ कार्यकर्ते शांबा तुयेकर, पिळर्णचे पंच संतोष बांदोडकर, गिरीचे माजी सरपंच सिद्धेश साळगावकर, निरुपा साळगावकर, शितल वझरकर, उदय कांदोळकर, फेलिक्स रॉड्रिगज उपस्थित होते.
भाजपच्या आमिषांना बळी पडू नका : केदार नाईक
रोजगाराचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न भाजपवाले करणार आहेत, मात्र त्यांच्या या आमिषाला बळी पडू नका. आम्ही त्यांच्या बरोबर नाही हे सांगण्यासाठीच ही सभा बोलविण्यात आल्याचे केदार नाईक म्हणाले.
राग पक्षावर नाही, आयात केलेल्या आमदारावर : रुपेश नाईक
भाजप सर्वसामान्यांचा पक्ष आहे, असे आम्हाला वाटायचे. मतदारांनी पक्षासाठी सदैव साथ दिली. अशात आज भाजपने कोणालाच विश्वासात न घेता दुसऱया पक्षाचा आमदार आयात केला. त्याचा आम्हाला राग आला आहे. पक्षाबद्दल कुणालाच राग नाही. आम्ही 25 वर्षे पक्षासाठी काम केले. आमिषांना बळी पडलो नाही. साळगावात चांगले कार्यकर्ते असून त्यांची मजबूत फळी आहे. भाजपला घाण म्हणणाऱया जयेश साळगावकरांनी प्रथम शुद्धीकरण करुन घ्यावे, असे जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक म्हणाले.
पक्षाने मला जिल्हा पंचायत अध्यक्षपद देण्याची ऑफर दिली आहे, पण मला अध्यक्षपद नको, कार्यकर्ते हवे आहेत. पक्षाला आमदाराला आयात करण्याची गरज नव्हती, असेही रुपेश नाईक म्हणाले.
आमच्याबरोबर जनसमर्थन : सुभाष चोडणकर
पंच सुभाष चोडणकर म्हणाले, आज आमच्याबरोबर सर्व लोक आहेत. सर्व लोक उमेदवाराची निवड करणार असून त्या बळावर त्याला निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेरुलचे पंच शशिकला गोवेकर यांनी लोकांनी आम्ही दिलेल्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
सर्वांनी एकत्रित राहावे : शांबा तुयेकर
शांबा तुयेकर म्हणाले की, सर्वांनी टुगेदर फॉर साळगावसाठी एकत्रित राहावे. जिल्हा पंचायतसाठी आम्ही भाजपला दोन सदस्य दिले, त्याचे फळ म्हणून आज आम्हाला हे पाहावे लागत आहे. जनता बरोबर राहिली तर आमचा उमेदवार नक्कीच निवडून येणार असल्याचे ते म्हणाले.
आम्हाला जयेश मान्य नाही : शितल वझरकर
शितल वझरकर म्हणाल्या की, पाच महिन्यापूर्वी महिला मोर्चा समिती निवडली आहे. पक्षाने ज्या ज्यावेळी आम्हाला हाक दिली तेव्हा आम्ही सहकार्य केले पण आम्हाला जयेश साळगावकर उमेदवार म्हणून नको आहे.
आमचे स्वप्न भंग केले : अविनाश नाईक
सांगोल्डाचे माजी सरपंच तथा पंच अविनाश नाईक म्हणाले की, जयेशबाबत कसले सर्वेक्षण केले ते आम्हाला माहीत नाही. आमदारावरील रागापोटी आम्ही रुपेश नाईक यांना जिल्हा पंचायतीवर निवडून आणले. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी रात्रीचे दिवस केले. असे असताना पक्षाने आमचा घात केला, आमचे स्वप्न भंग केले आहे. लोक आमच्याबरोबर असून त्याद्वारे टुगेदर फॉर साळगावच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू, असे ते म्हणाले.
सर्वांनी आशीर्वाद द्यावा : अजय गोवेकर
पक्षाची तत्वे कुठे पोहोचली ती आता सर्वांना समजली आहेत. आम्हाला साळगावात स्थिर आमदार हवा आहे. जिल्हा पंचायत सदस्य रुपेश नाईक व केदार नाईक यांनी लोकांना कोविड काळात आपला जीव धोक्यात घाऊन मदत केली आहे. अशा कार्यकर्त्यांना सर्वांनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन पंच अजय गोवेकर यांनी केले.
जयेशनी पाच वर्षात काय काम केले : फोंडू नाईक
गिरी पंचायतीचे पंच फोंडू नाईक म्हणाले की, गेली 25 वर्षे भाजपसोबत असून गिरी पंचसदस्य आहे. जयेशना प्रवेश देण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी नोकरी लावण्याचे आमिष दिले, मात्र आम्ही ते नाकारले. आम्हाला साळगाववासियांना उत्तरे द्यायची आहेत. भाजपने साळगाववासियांवर अन्याय केला आहे. जयेशने असे कोणते काम केले म्हणून त्याला भाजपत प्रवेश दिला आहे. आम्ही दोघांची नावे पुढे केली असून त्यातील एकाला निवडून द्यायचे आहे आणि जयेशचा पराभव करायचा असल्याचे ते म्हणाले.
पाठीमागून सुरा खुपसला : संदीप बांदोडकर
पिळर्णचे सरपंच संदीप बांदोडकर म्हणाले की, भाजपने पाठीमागून सुरा खुपसला आहे. पक्षासाठी आम्ही काय केले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्हाला विश्वासात न घेता जयेशला पक्षात प्रवेश दिला. जो पक्षाला घाण म्हणत होता तोच आता या पक्षात का आला. आम्ही सर्व एकत्रित असून पुढेही एकत्र राहाणार असल्याचे ते म्हणाले.
ही आपली शेवटची निवडणूक : परुळेकर
भाजपने जे काही केले आहे ते मलाही आवडलेले नाही. साळगावातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वेरे येथे जाहीरपणे नाराजी व्यक्त झाली आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री तथा माजी आमदार दिलीप परुळेकर यांनी तरुण भारतशी बोलताना व्यक्त केले.
साळगाव मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांत एकजूट आहे. हे कार्यकर्ते काही दहा, पंधरा, वीस वर्षे भाजपशी संलग्नित आहेत. सगळे सुजाण, ज्ञानी आहेत. त्यांनी आपली बाजू व्यक्त केली आहे. भाजपला उमेदवार मिळत नसल्यास आम्हा सर्वांना बोलावून घेऊन चर्चा करायला पाहिजे होती. त्यावर पर्याय शोधायला पाहिजे होता. आज जाहीरसभेत दोन नावे घेण्यात आली असली तरी त्यांनी सर्वेक्षण करतो असे सांगितले आहे. नंतर पाहुया. सर्वेक्षणात कोण तिसरा येतो की अन्य कोण येतात.
आपण इच्छुक आहात काय विचारले असता, आपण पहिल्या दिवसापासून इच्छुक असल्याचे सांगितले आहे. येणारी निवडणूक आपली शेवटची आहे. यापुढे जो कोणी रिंगणात राहील त्याला आपण मदत करणार, असे ते म्हणाले.