उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची माहिती
प्रतिनिधी / मडगाव
साळावळी धरणामुळे 48 वर्षापूर्वी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचे मालकी हक्क देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे. काल बुधवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात त्या दृष्टीकोनातून महत्वाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय तसेच सांगेचे आमदार प्रसाद गांवकर उपस्थित होते.
साळावली धरणामुळे विस्थापित झालेल्यांना जमिनीचे मालकी हक्क वाटपाची प्रक्रिया गोवा सरकारने सुरू केली असून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 1972 साली धरणस्थळापासून विस्थापित झालेल्या 643 कुटुंबांपैकी 216 कुटुंबांना भूखंड वाटप करण्यात आले आहे. याआधीच भूखंड वाटप झालेल्या पीडित कुटुंबांना सनद देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
भू-वर्ग दोन मधील रहिवासी आणि पूर्वीच्या भूखंड ताब्यात असलेल्यांना भू-वर्ग दर्जा एक प्रदान करणे आणि भूखंडांच्या वाटपाशी संबंधित समस्या सोडविण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने हातात घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सद्या 8 सर्व्हेयर या कामांत गुंल्याची माहिती महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली. या वर्षाच्या अखेरीस अनेक प्रश्न मार्गी लागतील असे ही त्या म्हणाल्या.
धरणग्रस्त विस्तापितापैकी 43 लाभार्थी अद्याप सापडलेले नाहीत. तर 85 जणांना अद्याप भू-खंड दिलेले नाहीत. त्यांनाही भू-खंड दिले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. धरण बांधण्याच्या वेळी कुर्डी- साळावली येथील मूळ गावातून लोकांना वाडे व वाल्कीणी या पुनर्वसन वसाहतीत विस्थापित करण्यात आले होते. विस्थापित कुटुंबांना 400 चौरस मीटर जमीन आणि 10,000 चौरस मीटर लागवडीयोग्य जमीन वाटप करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या महसूलमंत्र्यांनी केले दुर्लक्ष
यापूर्वी महसूलमंत्री झालेल्यांनी साळावळी धरणग्रस्ताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गेली 48 वर्षे हा प्रश्न सुटू शकला नव्हता. मात्र, आत्ता जेनिफर मोन्सेरात या महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांनी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले व त्यामुळेच आज धरणग्रस्तांचा प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याचे उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले. जेनिफर मोन्सेरात जर हा प्रश्न सोडवू शकतात तर इतरांना ते का शक्य झाले नाही असे कवळेकर म्हणाले.
धरणग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय तसेच उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याची माहिती यावेळी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली.