प्रतिदिन 1500 ते 2000 शुल्क
एका दिवसात 190 चाकरमानी दाखल
कुटिर रुग्णालयात कोविड कक्ष सुरू
गावात वादावादीचे प्रसंग वाढले
वार्ताहर / सावंतवाडी:
मुंबई, पुणे व परदेशातून गावी येणाऱयांना सावंतवाडीत संस्थात्मक क्वारंटाईनसाठी दरदिवशी सुमारे 1500 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत. एकूण 38 जणांना पेड क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहरासह तालुक्यात गुरुवारी एका दिवसात 190 चाकरमानी दाखल झाले. रेड झोनमधून आलेल्या विद्यार्थिनीला सातार्डा हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने तिला कणकवलीत मैत्रिणीसोबत क्वारंटाईन होण्याची वेळ आली. तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांनी सातार्डा
ग्रामस्थांना समज दिली. शाळेत क्वारंटाईनला विरोध केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक आयोजित केल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी शहरात पेड क्वारंटाईन व्यक्तींनी चार हॉटेल्स भरली आहेत. पेड क्वारंटाईनसाठी 1500 ते 2000 रुपये मोजावे लागतात. त्या शिवाय जेवण, नाष्टा, चहासाठी वेगळा दर आहे. प्रत्येक हॉटेलने आपले वेगळे दर ठेवले आहेत. एसी, नॉन एसीचे दर वेगवेगळे आहेत. सैनिक वसतिगृह व रेस्टहाऊसमध्ये 35 जण तर हॉटेलमध्ये 38 जण क्वारंटाईन आहेत, असे पालिकेच्या वरिष्ठ लिपिक आसावरी शिरोडकर यांनी स्पष्ट केले. रेड झोनमधून येणाऱयांच्या तपासणीसाठी कुटिर रुग्णालयात विशेष कक्ष सुरू केला आहे. डॉ. उत्तम पाटील, डॉ. सागर जाधव, नर्स, कर्मचारी त्यांची तपासणी करत आहेत.
तालुक्यात 505 क्वारंटाईन
तालुक्यात आतापर्यंत 505 जण क्वारंटाईन आहेत. तर निम्मे होम क्वारंटाईन आहेत. गुरुवारी एका दिवशी 190 जण दाखल झाले. चाकरमान्यांसाठी गावातील शाळा अपुऱया पडत आहेत. त्यामुळे कॉलेज, महाविद्यालयाच्या इमारती ताब्यात घेण्यात येत असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाला मन:स्ताप
तालुक्यात दरदिवशी रेडझोनमधून 70 ते 100 जण दाखल होत आहेत. गावागावात रेड झोनमधून येणाऱयांना वाढता विरोध होत आहे. त्यांना आवरणे
प्रशासनासाठी मन:स्ताप ठरू लागला आहे. आरोग्याचा प्रश्न तसेच शाळांमध्ये अपुऱया सुविधा, पाणी समस्या, रात्रपाळी कुणी करायची याबाबत नियोजन करणे कठीण होत आहे. त्यामुळे पेड क्वारंटाईनचा मार्ग अनेकजण पत्करत आहेत.
साटेली तर्फ सातार्डा गावात एका व्यक्तीला क्वारंटाईन करून घेण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. याबाबत तहसीलदार म्हात्रे व बीडिओ नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली असता, गावात एकच शाळा आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती अगोदरच क्वारंटाईन आहे. त्यामुळे दुसऱया व्यक्तीला जागा नाही, असे सांगण्यात आले. अखेर म्हात्रे यांनी त्या व्यक्तीला सावंतवाडीत क्वारंटाईन केले. क्वारंटाईन नियोजनाबाबत सरपंच, नियंत्रण समिती, ग्रामसेवक, तलाठी यांची दमछाक होत आहे.
28 जण आयसोलेशनमध्ये
तालुक्यात आतापर्यंत 28 जण आयसोलोशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. तर संस्थात्मक विलगीकरणात 143 जण आहेत. अन्य व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी स्पष्ट केले.