केसरी, दाणोलीत अनेक घरे, झाडांची पडझड : दहा लाखाहून अधिक नुकसान : आंबोली परिसरातही मुसळधार
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात मंगळवारी सायंकाळी अचानक प्रचंड गडगडाटासह वादळी पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच कमालीच्या वाढलेल्या उष्म्याचे उत्तर सायंकाळी झालेल्या पावसातून नागरिकांना मिळाले. शहरातही जोरदार वाऱयासह ढगांचा गडगडाटही झाला.
सहय़ाद्री पट्टय़ातील केसरी, दाणोली, फणसवडे भागात चक्रीवादळामुळे घरांचे पत्रे उडून गेले. काजू, आंबा, पोफळींची मोठी पडझड झाली. सुरेश सावंत यांच्या घरावर झाड कोसळले. माजगाव, मळगाव, माडखोल, सांगेली, कलंबिस्त भागातही वादळी वाऱयासह पाऊस झाला. केसरी धनगरवाडी येथील संतोष जंगले, न्हानू पाटील, जनार्दन गोरे, गुरुनाथ जंगले, भरत गोरे, धोंडी लांबर, विजय जंगले यांच्या घरांना वादळाचा मोठा तडाखा बसला. प्राथमिक अंदाजानुसार तेथे दहा लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज तहसील कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला.
आंबोली परिसराला मोठा तडाखा
आंबोली : आंबोली, चौकुळ भागात विजेच्या गडगडासह तब्बल एक तास वादळी पाऊस झाला त्यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. काही ठिकाणी गाराही कोसळल्या. गटारे तुडुंब भरून वाहत होती. चौकुळ चुरणीची मुस येथील गंगु कोकरे यांच्या घराचे छप्पर उडून गेले. चंदगड तालुक्याच्या बाजूने आलेल्या पावसाने प्रथम चौकुळ चुरणीची मुस येथे गडगडाट आणि वादळी वाऱयासह थैमान घातले. गंगू कोकरे यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे वादळी वाऱयाने उडून गेल्याने त्यांच्या घरात पाणी शिरले होते. नंतर आंबोली परिसरात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱयासह पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. या परिसरातील भातशेतीचेही मोठे नुकसान झाले. कापणीस आलेली भातशेती साफ जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी, ग्रामस्थ पुरते हतबल झाले.
बांद्यातही अवकाळी पाऊस
बांदा : परिसरात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन काजू, आंबा हंगामात व अन्य पिके धोक्यात आली आहेत. विजेचा कडकडाटासह पावसाने काही ठिकाणी झोडपून काढले. इन्सुली येथे अर्धा तास झालेल्या पावसाने दुचाकी वाहन चालकांची धावपळ उडाली.
केसरी-धनगरवाडीला वादळाचा तडाखा
ओटवणे : मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी मुसळधार पावसामुळे केसरी- धनगरवाडी येथील घरांना मोठा तडाखा बसला. अनेक घरांची छपरे व पत्रे उडून गेल्याने घरांचे मोठे नुकसान झाले. या पडझडीत घरे व बागायतीचे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचायत समितीचे माजी सदस्य राघोजी सावंत यांनी तात्काळ धनगरवाडी येथे धाव घेऊन या नुकसानीची पाहणी करीत मदतकार्य सुरू केले. सरपंच देवेंद्र सावंत यांनीही घटनास्थळी जात मदतकार्यात सहभाग घेतला.
मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केसरी गावातील अनेक घरांना याचा तडाखा बसला. अनेक घरांची कौले उडून गेली. केसरी धनगरवाडीतील संतोष जंगले, न्हानू पाटील, जनार्दन गोरे, गुरुनाथ जंगले, भरत गोरे, धोंडी लांबर, विजय जंगले यांच्या घरांना या वादळाचा मोठा तडाखा बसला. दरम्यान, काजू, पोफळी आदी बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले. अनेक पोफळी व काजूची झाडे जमीनदोस्त झाली. बागायतदारांना याचा मोठा फटका बसला.
या घरांचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिली. त्यानंतर त्यांनी स्थानिक तलाठय़ांना नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले आहेत.
सहय़ाद्री पट्टय़ात वादळी वाऱयासह पाऊस
सहय़ाद्री पट्टय़ातही जोरदार वाऱयासह पाऊस झाला. दुपारी तीन वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण होते. दाणोली, सांगेली, ओटवणे दशक्रोशीत चार वाजल्यापासून मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सध्या आंबा, काजूचा हंगाम असल्याने या पावसाने साऱयांचीच तारांबळ उडाली.