पालकमंत्र्यांची ग्वाही : कुणी अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची तयारी!
प्रतिनिधी / सावंतवाडी:
आमदार दीपक केसरकर आणि खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी मतदारसंघाच्या विकासासाठी जशी मेहनत घेतली होती, तशी मेहनत घेऊन मतदारसंघाचा विकास करण्यात येईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. कुणी अंगावर आल्यास पालकमंत्री म्हणून शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सामंत यांचा तालुका शिवसेनेतर्फे सत्कार कार्यक्रम येथील वैश्य भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शैलेश परब, प्रदीप गोडकर, जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अशोक दळवी, अपर्णा कोठावळे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, आनारोजीन लोबो, भारती मोरे, श्रुतिका दळवी, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.
आम्ही विकासकामे करून जनतेची मने जिंकणार आहोत. शहरासाठी, मतदारसंघासाठी आणि जिल्हय़ाच्या विकासासाठी केसरकर यांनी जसे प्रयत्न केले तसे प्रयत्न यापुढेही करण्यात येतील. सर्वांना विश्वासात घेऊनच विकासकामे करण्यात येतील. विकासकामे करताना महाविकास आघाडीलाच श्रेय मिळावे, यादृष्टीने प्रयत्न राहतील. यापूर्वी आम्ही विकासकामे करायची आणि त्याचे श्रेय इतरांनी घ्यायचे, असे प्रकार होऊ दिले जाणार नाही. आता बंगल्यात बसून काम होणार नाही. तर थेट लोकांपर्यंत जाऊन कामे करण्यात येतील. 2022 मध्ये जिल्हा पीरषदेच्य 35 हून अधिक जागा जिंकण्याचे टार्गेट असणार आहे. त्यासाठी आतापासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कामाला लागावे, असे आवाहन सामंत यांनी केले.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, दहशतवादी वृत्तीमुळे अनेकांचे बळी गेले. ही संस्कृती आता सावंतवाडीपर्यंत आली आहे. येथील उमेश यादव यांची आत्महत्या नसून तो राजकीय बळीच आहे. अशाप्रकारची प्रवृत्ती सावंतवाडीतून उखडुन टाकणार आहोत.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, यापूर्वी मी जिल्हय़ाचा पालकमंत्री म्हणून विकास केला. सिंधुदुर्ग जिल्हय़ाची ही प्रगती नूतन पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यकाळातही सुरू राहील. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार, महिला यांचे
प्रश्न सुटतील.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक हनुमंत सावंत, रुपेश राऊळ, प्रशांत कोठावळे, नारायण राणे आदींच्या हस्ते सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठय़ा संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भोसले, सुरेश गवस, सत्यजीत धारणकर, संदीप राणे यांनीही सामंत यांचे स्वागत केले.