चिपळूण
शहरातील वडनाका परिसरात एका रिक्षा व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास उघडकीस आली. अभिजित अरुण गुरव (38, लक्ष्मी गणेश अपार्टमेंट-चिंचनाका) असे आत्महत्या केलेल्या रिक्षा व्यावसायिकाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठय़ा लिहून ठेवल्या असून त्यात त्याने मित्रांकडून घेतलेले पैसे कुटुंबाला शक्य झाल्यास परत करावेत, असे नमूद करत मित्रांची नावे लिहिली आहेत. याचवेळी गेले 8 दिवस त्याला पैसे घेतलेल्या सावकारांकडून त्रास होत होता व यातूनच त्याने जीवन संपल्याची चर्चाही सुरु आहे. या बाबतची खबर अमोल अरुण गुरव (39, रावतळे) यांनी दिली आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित गेल्या काही वर्षापासून शहरातील चिंचनाका येथे रिक्षा व्यवसाय करीत होते. त्यांनी 23 रोजी सकाळी 8 ते 9.30 च्या सुमारास बेडरुममध्ये छताच्या पंख्याला नायलॉन दोरी बांधून गळपास लावून घेतला. हा प्रकार चुलती वीणाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अमोल गुरव यांना माहिती दिली. यानंतर बेडरुममध्ये प्रवेश करून दोरी कापून अभिजितला खाली उतरवले व तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले.
अभिजितने आत्महत्येपूर्वी दोन चिठ्ठय़ा लिहून ठेवल्या आहेत. त्यातील एका चिठ्ठीत मित्रांकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख आहे. दुसऱया चिठ्ठीत सावकार कशी पिळवणूक करत होते, याची सविस्तर माहिती आहे. मात्र या सावकारांची नावे लिहिलेली नाहीत. गेले 8 दिवस त्याला पैसे दे, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे दूरध्वनी येत होते, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. त्यामुळे मोबाईलच्या तपासानंतर या सावकारांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मिनाद कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.