आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करा; जिल्हाधिकाऱयांना ग्रामस्थांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सावगाव येथे मे महिन्यामध्ये जमिनीच्या वादातून दोघांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात 14 ते 15 जणांचा समावेश आहे. मात्र, केवळ सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. राजकीय दबावाखाली पोलिसांनी इतरांवर गुन्हे दाखल केले नाहीत. तेव्हा योग्यप्रकारे या घटनेचा तपास करून खून प्रकरणात सामील असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी सावगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
सोमवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. संशयित आरोपी जयवंत गुंडोजी देसूरकर, समीर सुरेश देसूरकर, राहुल अर्जुन देसूरकर, सुरेश गुंडोजी देसूरकर, अर्जुन गुंडोजी देसूरकर, सागर अर्जुन देसूरकर (सर्व रा. बेनकनहळ्ळी) आणि सावगाव येथील कर्लेकर कुटुंबांमध्ये जमिनीबाबत वाद होता. त्यातून वरील संशयितांनी दि. 21 मे 2021 रोजी सावगाव येथे जाऊन कर्लेकर कुटुंबावर हल्ला केला.
धारदार शस्त्राने हल्ला केल्याने रविंद्र नारायण कर्लेकर (वय 36) याचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत नारायण कल्लाप्पा कर्लेकर आणि इतर घरांतील काही जण जखमी झाले. नारायण यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, राजकीय दबावाखाली पोलिसांनी इतर गुन्हेगारांवर गुन्हा नोंदविला नाही, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या खून प्रकरणामध्ये 14 ते 15 जण आहेत. त्यामुळे अजूनही कर्लेकर कुटुंबीयांना धोका असून तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. पोलिसांनी या सर्वांवर भा.दं. वि. 302, 307 सह इतर गुन्हे दाखल केले आहेत. तेव्हा योग्यप्रकारे न्यायालयासमोर दोषारोप दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य गणपत पाटील, निंगाप्पा मोरे, मल्लाप्पा सावगांवकर, महेश पाटील, बसवंत कुट्रे, मारुती कुट्रे, निलेश कुट्रे, ओंकार सुतार, कल्लाप्पा कुट्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.