जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
गेल्या दोन आठवडय़ापासून जिल्हय़ात पॉझिटीव्हिटीचा वाढणारा रेट चिंता वाढवत असला तरी काळजी घेवून संसर्ग रोखणे हाच खरा उपाय आहे. मागील लढाईत आपण सर्वांनी हीच काळजी घेतली आहे. आताही कोरोना संपलेला नाही हे ध्यानात ठेवत नागरिकांनी मास्क, हात स्वच्छ धुवणे, सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे गांभिर्याने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारी केले आहे. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, सक्त सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी 110 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही बाधिताचा मृत्यू नसल्याचा दिलासा असून रात्री उशिरा आलेल्या अहवालात 00 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.
काळजी हाच मोठा उपाय- जिल्हाधिकारी
मार्च महिन्यापासून कोरोनाविरुध्दचा लढा सुरु असून सप्टेंबर महिन्यात मोठी जिल्हय़ात आली होती. मात्र, त्यातून देखील आपण सर्वजण सावरलो आहोत. नागरिकांनी काळजी घेत केलेल्या सहकार्याचा यात मोठा आहे. गेल्या दोन आठवडय़ापासून बाधित वाढ मोठी नसली तरी चिंताजनक असून संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी नियम पाळून काळजी घेण्याची गरज आहे. परदेशात दुसरी लाट आली पण भारतात आली नाही. लसीकरण सुरु झालेय म्हणून बेफिकीरी न दाखवत धोक्याची शक्यता लक्षात घेवून केलेला उपाय अधिक चांगला ठरेल, असेही सांगत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काळजी घेण्याचे आवाहन केलेय.
शाळा, महाविद्यालयांनी दक्ष रहावे
जगरहाटी सुरु झालीय त्यातच आता शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून त्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत गाईड लाईन्स देण्यात आलेल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांनी याबाबत कोणतीही ढिलाई न दाखवता विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी तसेच त्यांना काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे सांगतानाच शालेय विभागाला ही माझी सक्त सूचना असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
शिवजयंती साधेपणाने साजरी करा
19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंती निमित्त गडांवर सामुहिक कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन करु नये. अभिवादनासाठी फक्त 10 नागरिकांनी उपस्थित रहावे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपल्या राज्याचे नव्हे संपूर्ण देशाच्या आस्थेचे स्थान आहे. ते आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारं आहे. त्यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर, सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून आपण पण एक वेगळे उदाहरण घालून द्यावे, परंतु या कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
270 जणांचे नमुने तपासणीला
जिल्हा रुग्णालय सातारा 32, कराड 57, फलटण 14, कोरेगाव 16, वाई 33, खंडाळा 7, रायगाव 31, पानमळेवाडी 13, महाबळेश्वर 15, म्हसवड 6, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 46 असे एकूण 270 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.