प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावला खरोखरच कोरोनाची धास्ती आहे? कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेले लॉकडाऊनचे नियम बेळगावकरांनाही लागू आहेत? सामाजिक अंतर म्हणजे काय?, मास्क कशासाठी, असे प्रश्न सध्या प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्राला पडले आहे. कोरोना गायब झाला अशा भ्रमात सध्या बेळगावकर वावरत असून सर्वत्र सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱया एसएसएलसी परीक्षेच्यावेळी जर लॉकडाऊनचे नियम पाळले गेले नाहीत तर महाभयंकर परिस्थिती निर्माण होवू शकते.
साधारण अडीच महिन्यानंतर म्हणजे 70 दिवसानंतर लॉकडाऊन शिथिल झाले. हळुहळू कार्यालये सुरू झाली. महानगरपालिका, न्यायालये, दवाखाने, उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक वाहतूक कार्यालय, परिवहन विभाग, कृषी, आरोग्य, पशुवैद्यकीय, बागायत, अबकारीसह सर्व कार्यालयांमध्ये प्रत्येक नागरिकाचे काहीना काही काम असतेच. तीन महिन्यांच्या अंतरानंतर आपली खोळंबलेली कामे पूर्ण करुन घेण्यासाठी नागरिक प्रत्येक कार्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाचे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय. मात्र या कार्यालयासह सर्वत्र सध्या सामाजिक अंतराचा पूर्ण फज्जा उडाला आहे.
‘मास्क डे’ दिवशी सुध्दा मास्क वापराकडे दुर्लक्ष
इतकेच नव्हे तर मास्क वापरणे, स्वच्छता राखणे याबाबतसुध्दा शहरवासीय कमालीचे उदासिन आहेत. रस्त्यावर थुंकणाऱयालासुध्दा दंड केला जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले. परंतु आजही सर्वत्र रस्त्यावर पिचकाऱया मारणाऱयांची संख्याच अधिक आहे. ‘मास्क डे’ दिवशी सुध्दा मास्क वापरला गेला नाही. त्यामुळे आता तो वापरला जाईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
बाजारपेठेत कोरोनाचा पूर्णतः विसर
सर्व कार्यालयांमध्ये सॅनिटायझर आणि थर्मल स्क्रिनिंग सुविधा आहे. परंतु गर्दी वाढल्यानंतर या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱयांवर मर्यादा येतात. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी येणाऱया लोकांना या अंतराचे भान राहत नाही. विविध संघटना, मोर्चे घेवून आल्यानंतर गर्दीला नियंत्रणाखाली आणेपर्यंत पोलीस यंत्रणेच्या नाकीनऊ येते. बाजारपेठेला तरी कोरोनाचा पूर्णतः विसर पडला आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी झालेली गर्दी पाहता बेळगावला कोरोना नव्हताच की काय? अशा भ्रमात नागरिक वावरत असावेत, असे प्रकर्षाने जाणवते. नागरिकच उदासिन असल्याने प्रशासनही उदासिन झाले आहे. त्यातच गुरुवारपासून एसएसएलसी परीक्षा होत आहे. सध्या ही परीक्षा देणारे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्या पालकाप्रमाणेच आपल्यावरही समाज म्हणून निश्चित आहे. दुर्दैवाने शिक्षण खात्याने पालकांनी आपल्या मुलांना परीक्षा केंद्रांवर आणून सोडावे, असे स्पष्ट केल्याने गुरुवारी परीक्षा केंद्रावर गर्दी होण्याची दाट शक्मयता आहे. प्रशासन, पोलीस, शिक्षण खाते आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी, पालकांनी सजग होवून स्वतःच सामाजिक अंतर पाळण्याचा विवेक बाळगला पाहिजे.