नवे नियम झाले लागू : शहर वाहतूक शाखेकडून आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र शासनाने 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मोटर वाहन कायद्यात नवीन पद्धतीने सुधारणा केलेली आहे. या नवीन पद्धतीने केलेल्या सुधारणाचे वाहनधारकांनी अवलोकन केले पाहिजे. मोटर वाहन कायद्याची जी जुनी दंड प्रणाली होती. ती आता कालभाय्य झाली आहे. आणि नवीन दंड प्रणाली अस्तित्वात आली आहे. जुने दंड दुप्पट झाले आहेत. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. नव्याने लागू करण्यात आलेल्या मोटार वाहन कायद्याच्या दंडाबद्दल पोनि शेलार बोलत होते.
यावेळी पोनि शेलार म्हणाले, जे वाहनधारक महामार्गावरून जाताना हेल्मेट वापरत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करत 500 रूपये दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्यात येणार आहे. लायसन्स शिवाय वाहन चालविल्यास नव्या दंडानुसार 5 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास 500 रूपये, सिट बेल्टचा वापर न केल्यास 500, ट्रिपल सिट 1 हजार, वाहनांच्या काचेवर काळे आवरण 500 रूपये, लायसन्स जवळ न बाळगणे 500 रूपये, फॅन्सी नंबरप्लेट 1 हजार, नो-एन्ट्री, वनवे मध्ये प्रवेश केल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे सर्वांनी वाहतूकीचे नियमांचे पालन करा. नियम मोडू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल. या नव्या नियमांबद्दल अद्याप वाहनधारकांना माहिती नाही. यांची जनजागृती आम्ही करत आहोत.