कोरोनाबाधितांमध्ये झपाटय़ाने वाढ : ‘आयसीएमआर’कडूनही सावधगिरीचा इशारा, देशवासियांची चिंता वाढली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असूनही संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशात पुन्हा एकदा सर्वाधिक जवळपास 39 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 543 जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या आकडय़ांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने देशात आता समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झाल्याचे ‘आयएमए’ने मान्य केले आहे. त्यामुळे आता देशवासियांनी अधिकाधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे.
आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतात समूह संसर्ग सुरू असल्याचे प्रथमच मान्य केले आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या आणि त्यात आता आयएमएने समूह संसर्ग सुरू झाल्याचे मान्य केल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. सध्या पावसाळय़ाचे दिवस सुरू झाल्याने अन्य आजारांची लागणही होऊ शकते. मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा यांसारख्या पावसाबरोबरच राज्यात साथीचे आजारही वाढत चालले आहेत. विविध राज्यांमध्ये कोविड केंद्रे म्हणून ताब्यात घेण्यात आलेली इस्पितळे तुडुंब भरल्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय यंत्रणेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता प्रत्येकालाच कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे कठीण : आयएमए
देशात कोरोनाचे 10 लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत असल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याचे ‘आयएमए’ हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी म्हटले आहे. दिल्लीमध्ये कोरोना नियंत्रणात असला तरी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्यप्रदेशमधील दुर्गम भागात परिस्थिती कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत असल्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे. प्रत्येकाने आपल्यासह कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन प्रत्येकाने करायला हवे. या विषाणूशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे असेही ‘आयएमए’ने म्हटले आहे.