हिंदू जनजागृती समितीची मागणी
प्रतिनिधी / सावंतवाडी:
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसने प्रसारित केलेले ‘वीर सावरकर-कितने वीर?’ या पुस्तकावर बंदी घालणे, संबंधित लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे या मागणीसाठी शहरातील गांधी चौकात हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदू धर्माभिमानी यांच्यावतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.
भोपाळ (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर कितने वीर?’ या नावाचे पुस्तक वाचण्यात आले. या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित वेगवेगळय़ा घटना, प्रश्न याविषयी हेतूतः वाद निर्माण करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. यातून देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचाही कुटिल हेतू असल्याची शंका येते. या आंदोलनात धर्मप्रेमी हिंदूंकडून काही मागण्या करण्यात आल्या. ज्या लेखकाने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याविषयी अत्यंत चुकीची अन अश्लाघ्य माहिती प्रसिद्ध केली आहे, त्याला तात्काळ अटक करावी. तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. केंद्र सरकारने ‘वीर सावरकर-कितने वीर?’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी. तसेच वितरित झालेल्या प्रती परत मागवाव्यात. कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा असा होणारा अपमान कायमचा थांबविण्यासाठी शासनाने नवा कायदा बनवावा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तात्काळ भारतरत्न जाहीर करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन केंदीय गृहमंत्र्यांना देण्यासाठी तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे.