प्रतिनिधी / कसबा बीड
सावरवाडी ता. करवीर येथे सोमवारी नारळाच्या झाडावर वीज पडून राहत्या घराच्या भिंतीला तडे गेले. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची तारांबळ उडाली. गेले दोन दिवस प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सोसाट्याचा वारा व विजा कडाडू लागल्या. त्यावेळी अचानक सुभाष विष्णू खोत यांच्या परसबागेतील नारळाच्या झाडावरती वीज पडल्याने झाडाने पेट घेतली. विजेचा तडाका एवढा जोरात होता की, त्यामुळे सुभाष खोत यांच्या घराच्या भिंतीला तडे गेले. सुदैवाने लाईट गेलेले असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर लाईट असती तर आजूबाजूंच्या घरातील सर्व इलेक्ट्रिक वस्तू व मीटर्स यांचे नुकसान झाले असते.राहत्या घराच्या भिंतीला तडा गेल्याने जवळपास 50 हजार चे नुकसान झाले. या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, त्यामुळे दैव बलवत्तर असेच म्हणावे लागेल. सदर घटनेचा पंचनामा माझी पोलीस पाटील गजानन खोत, तलाठी, व ग्रामसेवक श्री. पाटील साहेब यांच्या उपस्थितीत झाला.