सावळज / वार्ताहर
सावळज परीसराला सहा दिवसानंतर मंगळवारी विजेच्या कडकडाटासह पुन्हा पावसाने झोडपले. जोरदार झालेल्या पावसामुळे द्राक्षबागायतदार नुकसानीने धास्तावला आहे. तर पुराच्या धास्तीने नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सावळजसह परीसरात अग्रणी नदीच्या महापुराचे थैमान घातले होते. पावसाने अग्रणी नदीला आलेल्या महापुराने येथील नदीवरील सावळज-बिरणवाडी व सिध्देवाडी- चव्हाणवस्ती पुल तुटून वाहुन गेले आहेत. तसेच बंधाऱ्याचे बांध फुटून बाजुने शेतात पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागेसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
आता पुन्हा मंगळवारी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. सावळज परीसरात मंगळवारी सायंकाळपासून सावळज, सिध्देवाडी, दहिवडी, जरंडी, अंजनी, गव्हाण परीसरात जोरदार विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे नदीला पुन्हा पुर येण्याची धास्ती निर्माण झाली आहे. तर सध्या गव्हाण-मणेराजुरी पुल पाण्याखाली गेला आहे. तसेच हवामान खात्याने आणखी जोरदार पावसाचा इशारा दिल्याने चिंता वाढली आहे.