आमदार सतीश जारकीहोळी : गोकाक येथे निबंध, वर्क्तृत्व स्पर्धा
वार्ताहर/ घटप्रभा
महिलांना सुशिक्षित व स्वावलंबी बनविण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी सर्व रुढी व परंपरांना फाटा देत कार्य केले. त्यांचे हे योगदान अतुलनीय आहे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
गोकाक येथील महर्षि वाल्मिकी क्रिडांगणावर मानव बंधुत्व संघटनेच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध व वर्क्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करून ते बोलत होते. आमदार जारकीहोळी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळय़ांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश चतुर्थी सणातून स्वातंत्र्य चळवळीसाठी जनजागृती केली. शाहू महाराजांनी अस्पृश्यता दूर केली. महात्मा गांधी यांनी चळवळीद्वारे अहिंसेतून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून देशात ऐक्याची भावना निर्माण केली. अनेक थोर नेत्यांनी जीवनात त्याग व बलिदानातून भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे महान काम केले आहे. आजच्या भावी पिढीला अशा सर्वांची माहिती असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
निबंध स्पर्धेत वैष्णवी कडोलकर-सोनोली बेळगाव, ज्योती गुद्दीन-शिरगुप्पी, सुधा कर्ली-रायचूर, सीमरन बागवान-यादवाड गोकाक, मानस व्ही.-चामराजनगर, वर्क्तृत्व स्पर्धेत पूजा तीर्थहळ्ळी-तीर्थहळ्ळी, मुश्रीफ सय्यद-घटप्रभा, प्रियांका भरणी-गुलबर्गा, पवित्रा हत्तरवाट-मेळवंकी गोकाक, श्वेता जुगळे-धारवाड, शामला हिरोजी-कलखांब या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विजेत्यांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्रासह हेलिकॉप्टरमधून गोकाक परिसराचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी प्रियांका जारकीहोळी, राहुल जारकीहोळी, रविंद्र नायक, रयाज चौगुला, रामकृष्ण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.