प्रतिनिधी/मडगाव
सासष्टीच्या किनारपट्टी भागात दररोज दोन-तीन धिरयांचे आयोजन होत असून त्यावर मोठय़ा प्रमाणात सट्टेबाजी चालत आहे. या धिरयोचे आयोजन पोलिसांच्या आशीवार्दाने होत असल्याचे आत्ता लपून राहिलेले नाही. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेला आहे. त्यात धिरयोवर होत असलेली सट्टेबाजी तसेच कमिशन किती प्रमाणात सुरू आहे. त्याची पोलखोल झालेली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पर्यंत पोचला आहे.
सासष्टीत धिरयोचे आयोजन होण्याचे प्रकार हे तसे नवीन नाहीच. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. खास करून गावात एखाद्या उत्सव किंवा कार्यक्रम असेल तर हमखास धिरयोचे आयोजन होत असते. कुणाचा रेडा किंवा बैल धिरयो जिंकणार यावर लाखो रूपयांची पैज लावली जाते. साहजिकच धिरयो पहाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी देखील होत असते. या धिरयो आयोजनाला स्थानिक राजकारण्यांचा नेहमीच आशीवार्द लाभत आलेला आहे.
मुक्या जनावरांचा धिरयोच्या आयोजनातून प्रुर छळ केला जात असल्याने, धिरयोच्या आयोजनावर कायदेशीर बंदी घातली आहे. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून सासष्टीत दर शनिवारी व रविवारी धिरयोचे आयोजन व्हायचे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात धिरयोचे आयोजन दररोज होण्याचे प्रकार वाढले आहेत. आत्ता तर विदेशातून गोव्यात आलेले अनेक तरूण या धिरयो आयोजनात गुंतले आहेत.
प्रत्येक धिरयोच्या मागे कमिशन
धिरयोचे आयोजन केलेल्या ठिकाणी कोणताच अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी अनेकांना कमिशन द्यावे लागते. त्यात पोलिसांचा देखील समावेश आहे. स्थानिक पंच, सरपंच यांना कमिशन द्यावे लागत असल्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमांतून पुढे आली आहे. जेव्हा कायदेशीर बंदी लागू झाली, तेव्हा पासून कमिशनचा भाग सुरू झालेला आहे. पूर्वी केवळ सट्टेबाजी चालायची व पोलिसांना ठराविक हप्ता दिला की काम व्हायचे.
धिरयो आयोजनाच्या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी होत असते, अशावेळी एखादी व्यक्ती जखमी झाली तर तिच्यावर उपचार आयोजकच करीत असल्याची माहिती देखील व्हिडिओच्या माध्यमांतून पुढे आली आहे. गेल्या काही दिवसामागे एका युवकाला पाय गमवावा लागला होता. त्याची गुप्तता ठेवण्यात आली होती. मात्र, ही बाब प्रसार माध्यमांसमोर आली व त्यावर बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर आगशी येथे धिरयोत एक रेडा जागीच ठार होण्याचा प्रकार घडला होता.
धिरयो आयोजनासाठी वरिष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाव येत असतो. त्यामुळे पोलीस धिरयो आयोजनाच्या ठिकाणी बऱयाच उशिरा दाखल होण्याचे प्रकार घडतात. आत्ता ताज्या घडामोडीवरील व्हिडिओ मुख्यमंत्र्यां पर्यंत पोचल्याने ते कोणते पाऊल उचलतात याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.