प्रतिनिधी / मडगाव
तौक्ते वादळामुळे सासष्टीतील खासगी मालमत्ता व शेती-बागायती मिळून एकूण 34 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज सरकारी अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. मामलेदार प्रतापराव गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सासष्टीतील खासगी मालमत्तांचे सुमारे 18 लाखांचे नुकसान झाले आहे. यात केवळ खासगी मालमत्तांचा समावेश आहे. आम्हाला सार्वजनिक मालमत्तेच्या आणि शेतीच्या नुकसानाचा अजूनही अंदाज आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमचे लक्ष लोकांचे जीवन आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यावर आहे. सासष्टीत मडगाव आणि कुंकळ्ळी हे भाग जास्त प्रभावित झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानाचा अंदाज बांधणे बाकी आहे. बराच काळ अंधारात असलेली सासष्टी आता बाहेर पडत आहे. चक्रीवादळामुळे मोठे नुकसान वीज सुविधा आणि मोबाईल नेटवर्कचे झाले आहे. परिणामी राज्यातील बऱयाच भागांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. मोबाईल सेवा कंपन्यांनी असे सांगितले आहे की, नेटवर्क कनेक्शन पूर्ववत करण्यास काही दिवस लागतील.
दरम्यान, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सासष्टीतील भातशेती, नारळाची लागवड, केळीच्या बागांवर वादळाचा परिणाम झाला आहे. कृषी खात्याच्या विभागीय अधिकाऱयांनी आतापर्यंत सासष्टीमध्ये शेती-बागायतीचे जवळपास 16 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज लावला असल्याचे सांगितले आहे.
पारंपरिक मच्छीमारांचे मोठे नुकसान
सासष्टीच्या किनारी भागाला भेट दिली असता लक्षात येते की, पारंपरिक मच्छीमारांच्या झोपडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक झाडे, विजेचे खांब आडवे झाले आहेत, तर घरांची छपरे उडून गेलेली आहेत. कोलव्याचे पंच आणि मासेमारीच्या लहान होडीचे मालक मिनिनो फर्नांडिस यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पारंपरिक मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कारण त्यांनी सुकवण्यासाठी ठेवलेले मासे आणि मीठ साठवलेल्या झोपडय़ा पूर्णपणे खराब झाल्या आहेत. त्यातच किनाऱयांवरील काही माड कोसळले आहेत.
बाणावली येथील स्थानिक मच्छीमार पेले यांनी सांगितले की, आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे चक्रीवादळ आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मानवी जीवनाची जास्त हानी झाली नाही म्हणून आपण देवाचे आभारी असले पाहिजे. सध्या सुरू असलेल्या कोविड महामारीमुळे गोव्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे आणि त्यात चक्रीवादळाने आणखीन भर घातली आहे, असे ते म्हणाले.
अग्निशामक दलाचे जवान तीन दिवस या संकटाचा सामना करत होते आणि अजूनही या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानाचा ते सामना करत आहेत. सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यात वीज सुविधा, कनेक्टिव्हिटी नेटवर्क आणि मालमत्ता, झाडे यांची हानी झाली. यंदाचा हंगाम हा पर्यटनासाठी सर्वांत वाईट हंगाम होता आणि त्यात आता या चक्रीवादळाने मोठय़ा प्रमाणात नुकसान केले आहे, असे कोलवा येथील एका शॅकचालकाने सांगितले.