देवगड येथील टोपली व्यावसायिकांनी व्यक्त केल्या भावना
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ
देवगड व जामसंडेतील अनेकांचा मदतीचा हात
अन्नम कुटुंबाला घराकडे परतीचे वेध
राजेंद्र मुंबरकर / देवगड:
बांबूच्या टोपल्या बनवून पोटाची खळगी भरण्यासाठी देवगड येथे तिरुपतीवरून आलेला मजूर आणि त्याचे कुटुंब लॉकडाऊनच्या काळात उपासमारीने जगत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. देवगडातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला असला तरीही त्यांना आता आपल्या गावाकडे जाण्याची आतुरता लागली आहे. येथील सातपायरी ठिकाणी महामार्गाच्यानजीक झोपडी करून हे कुटुंब राहत आहे. आठ महिन्याचे बाळ या उपासमारीत आपल्या आईवडिलांबरोबर राहत आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात तिरुपतीवरून कोल्हापूर मार्गे देवगडला आलेला अनिल अन्नम, त्याची पत्नी सौ. प्रतुशा, तीन वर्षाचा मुलगा विष्णूवर्धन व आठ महिन्याची कन्या जिचे नाव ठेवायलाही त्यांना वेळ मिळाला नाही असे हे कुटुंब छोटीशी झोपडी करून उदरनिर्वाहासाठी देवगडला आली आहे. बांबूच्या सहाय्याने छोटय़ाशा टोपल्या बनविण्याचा धंदा आहे. महिन्याला जेमतेम दोन ते दीड हजार रुपयांचा धंदा होतो. त्यात अनिल हा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. एका शहरातून दुसऱया शहरात असा त्यांचा हा संसाराचा गाढा हाकला जात आहे.
पंधरा दिवसांपासून घरात एकही पैसा नाही
कोरोनासारखे संकट आपल्या पुढे येईल, अशी पुसटशी कल्पनाही आम्हाला आली नाही. नाही तर आम्ही येथे आलोच नसतो, असे डोळय़ात आसवे आणून अनिल व त्याची पत्नी बोलत होती. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात जेमतेम आमचा दोन हजाराचा धंदा झाला. त्यात आम्ही पोटाची खळगी भरत होतो. देवगड येथे चार वर्षापूर्वी आलो होतो. त्यानंतर ही आता येण्याची वेळ तीही आमच्या गावच्या मित्राने पुन्हा देवगडला व्यवसायासाठी जाण्याचे सुचविले म्हणून आलो तर नशिबासमोर हे पुढे वाढलेले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून आपल्याकडे एकही पैसा शिल्लक नाही. देवगड व जामसंडेमधील काही चांगले लोक आम्हाला भेट देत असतात. त्यातील रोज दिवसा व रात्री जेवण देणारे देवमाणसे येतात. त्यामुळे तरी आमचे पोट भरते आहे. आठ महिन्याचे बाळ आहे त्यालाही दुधाची गरज असते. पण, आता तेही मिळत नाही, अशी अवस्था आमची झाली आहे, असे गहिवरून ते दोन्ही मायबाप सांगत होते. तीन वर्षाच्या विष्णूवर्धनला नेमके काय सुरू आहे याची पुसटशीही कल्पना त्या अजाण बालकाला नाही ते रोजप्रमाणे आपले मातीत तेथेच खेळत आहे. तिरुपतीला आमची शेती नाही. पावसाळय़ापर्यंत कोणत्याना कोणत्या शहरात टोपली बनवून व्यवसाय करायचा, हाच धंदा आहे. गावाकडे मजुरीला जेमतेम तीनशे रुपये मिळतात. पावसाळय़ात गावाकडे जाऊन लोकांच्या शेतात मजुरी करायची, असा आमचा वर्षभराचा कामाचा आलेख आहे.
हम इधरसे तुरंत निकल जायेंगे!
“भाईसाहब, ये काय लॉकडाऊन है पत्ता नही, सोला तारीखको खत्म हो जायेगा ऐसे लोग हमको आकर बताते है. प्लीज आप प्रेसवाले हो जब बस सुरू होगी तो बता दो हमको. हम इधरसे तुरंत निकल जायेंगे’’ असे डोळय़ात पाणी आणत अनिल हात जोडून सांगत होता. अतिशय हालाखीचे जीवन जगणारे हे अन्नम कुटुंब. आज त्यांच्या मदतीला देवगड व जामसंडेमधील अनेक हात पुढे होत आहेत. देवगड पोलीस, तहसीलदार कार्यालय यांनीही मदतीचा हात दिला आहे. अनिल सांगत होता आम्हाला जामसंडेमधून रोज एक माणूस न चुकता जेवण घेऊन येतो. आम्हाला त्या देवमाणसाचे नाव ठाऊक नाही. खूप लोक धीर देत आहेत. या धीरावरच आम्ही येथे वास्तव्य करीत आहोत. अन्नम कुटुंबाला परतीच्या प्रवासाला जाण्याची ओढ लागली आहे. कधी एकदा लॉकडाऊन संपते आणि हा संसाराचा रथ पुढे नेतो असेच झाले आहे.