प्रतिनिधी/ मडगाव
आज इंटरनेट, टीव्ही, मोबाईलमुळे आपण आपले जीवन कसे जगावे हे विसरलेलो आहोत. आज विद्यार्थी शिक्षण घेतात, पण ते आनंदाने शिक्षण घेताना दिसत नाहीत. आज प्रत्येक माणूस ताणवाचे जीवन जगताना दिसतो. तेव्हा साहित्य हेच माणसाला जगण्याची नवीन दिशा दाखवू शकते. तेव्हा प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. यातून आपल्या बुद्धीचा विकास तर होतोच, पण जे ज्ञान आपण साहित्यातून मिळवितो त्याच्या आधारे आपण देशाचा विकास घडवून आणण्यास मदत करू शकतो, असे उद्गार सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी काढले.
मडगावातील गोमन्त विद्या निकेतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विचारवेध व्याख्यानमालेत ‘साहित्य आणि जीवनमूल्ये’ या विषयावर ते बोलत हेते. प्रत्येकाने लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य थोर व्यक्तींचा आदर्श घेतला पाहिजे. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला कोणतीही चिंता नसते. जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा आपल्याकडे उर्जा, पैसे असतात, पण आपल्या माणसांशी बोलण्यासाठी वेळ नसतो. जेव्हा वयोवृद्ध होतो तेव्हा आपल्याकडे पैसे, वेळ असतो, पण उर्जा नसते आणि अशा वयात उर्जा देण्याचे काम साहित्य करते, असे मत डॉ. पाटणे यांनी व्यक्त केले.
साहित्य जगायला शिकविते
साहित्य आम्हाला जगायला शिकविते तसेच माणसे जोडायला मदतकारी ठरते. आस्थापनातील जेवण जेवण्यापेक्षा एक पुस्तक खरेदी करावे. कारण जेवण पचून जाईल, पण पुस्तके आपल्याला खचून जाण्यापासून सावरण्याचे काम करतात. माणसाला मरण आहे, पण ग्रंथांना नसते. जीवनात काही गोष्टी अशा असतात त्या दुसऱयांकडे व्यक्त करता येत नाहीत. पण आपण आपली व्यथा साहित्याच्या माध्यमातून दुसऱयांसमोर मांडू शकतो, असे डॉ. पाटणे पुढे बोलताना म्हणाले.
माणसाची सेवा ही सुद्धा ईश्वरसेवाच
देव देवळातच असतो असे नाही, तर तो माणसामध्येही असतो. माणसांची सेवा ही सुद्धा एक प्रकारची ईश्वरसेवाच असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. जेव्हा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा आपल्याला शिवरायांचे स्वराज्य निर्माण करायचे आहे, सामाजिक न्यायाचे राज्य उभे करायचे आहे व मराठी अस्मितेचे राज्य निर्माण करायचे आहे असे ते म्हणाले होते. पण आम्ही लक्षात ठेवले पाहिजे की, आम्हाला आमचे स्वराज्य टिकविता आलेले नाही. 1818 ला मराठी सत्ता गेली. याविषयी आपण चिंतन करायला हवे. आपण इतिहास कधीही विसरता कामा नये. पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे राज्य केले. गोव्यातील जनतेने सुद्धा गोव्याचा इतिहास विसरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
साहित्यातून संस्कृती टिकवावी
साहित्याच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाने माणसाला विचार करण्यासाठी बुद्धी, लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कला व लोकांची सेवा करण्यासाठी हात दिलेले आहेत. तेव्हा आपण त्यांचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आम्हाला पगार, वाहन, मोबाईल या सर्व गोष्टी जास्त प्रमाणात हव्या असे वाटत असते. पण ते आम्हाला सुखी जीवन देऊ शकत नाहीत. साहित्यातून मिळविलेले ज्ञानच आपल्याला आनंदमय जीवन देऊ शकते, असे डॉ. पाटणे यांनी सांगितले.