पुणे / प्रतिनिधी :
गझल या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात कधीही स्थान मिळाले नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून गझल या साहित्य प्रकाराचा प्रसार होऊ शकेल, यासाठी अनेक विनंती, अर्ज करून झाले. मात्र, पिंपरी–चिंचवड येथील साहित्य संमेलन वगळता साहित्य संमेलनात गझल हा साहित्य प्रकार सतत दुर्लक्षित राहिला, अशी खंत ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘सांस्कृतिक कट्टा’ या उपक्रमात पांचाळे यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी काही गझलांचे गायन केले. संघाचे खजिनदार सुनील जगताप, उपाध्यक्ष सुकृत मोकाशी उपस्थित होते.
गझलबाबत अनेक गैरसमज
गझलबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. गझलेने कवितेवर आक्रमण केले असेही सांगितले गेले. पण, कुठलाही कलाप्रकार हा एकमेकांसाठी पोषकच असतो. भावगीत ही शब्दप्रधान गायकी असेल, तर गझल ही आशयप्रधान गायकी आहे. गझल गाताना आशयाला प्रधान मानले पाहिजे. रसिकांना आपली गायकी दाखविण्यासाठी नाही, तर दोन ओळीतील शेरांचा आशय पोहोचवण्यासाठी गायन करायचे, हा दंडक पाळूनच मी गझल गायन करतो, असेही त्यांनी सांगितले.
गझल हा अंतर्मुख करणारा प्रकार
त्या–त्या टप्प्यात अनेक सामाजिक विषय ऐरणीवर आले. त्यामुळे समाजाच्या संवेदना टिपणारी गझल ही सामाजिक झाली. प्रेम आणि विरह या भावनांपलीकडे जात गझलमध्ये माणसाच्या जीवन–मरणाचे प्रश्न, समाजातील विषमता असे विषय आले. गझल हा अंतर्मुख करणारा प्रकार आहे. त्यावर कोणी नाचू शकत नाही. मात्र, प्रेम हाच गझलेचा स्थायीभाव आहे, तो गझलमध्ये यायलाच हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.