आज 35 वे मराठी साहित्य संमेलन : दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती
वार्ताहर/ कडोली
कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 19 रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्यिक आणि रसिकांच्या स्वागतासाठी कडोली ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
कडोलीत होणारे हे मराठी साहित्य संमेलन 35 वे असून संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी आमराईतील श्री शिवाजी हायस्कूलच्या पटांगणात आणि पॉलीफ्लो, पॉलिहैड्रॉन पुरस्कृत स्वामी विवेकानंद नगरीत भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी गावच्या प्रमुख मार्गावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
यावेळी ग्रंथदिंडीच्या मार्गात बदल करण्यात आला असून गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या मंदिरापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे. हभप महादेव जोतिबा बिर्जे यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून उद्यमबाग बेळगाव एसपीएम कंट्रोलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण शिवराम सावंत उपस्थित राहणार आहेत. कै. माधवराव (बाळ) बापूसाहेब भोसले स्मृती संमेलन मंडपाचे उद्घाटन कडोलीतील जीवनसेवा फाऊंडेशनच्या हस्ते होणार आहे. तर सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन सांगाती पतसंस्थेचे चेअरमन दयानंद कृष्णा सलाम यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर संमेलनाध्यक्ष डॉ. बालाजी जाधव यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. या सत्रासाठी शिवमुद्रा ढोलताशा ध्वज पथक कडोली आणि नवहिंद को-ऑप. सोसायटी येळ्ळूर प्रायोजक आहेत. दुपारी 1 वाजता दुसऱया सत्रात निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे ‘आईबाबा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक कलमेश्वर को-ऑप सोसायटी कंग्राळी बी. के. आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी आहे.
दुपारी 2 वाजता कडोलीतील प्रगतशील शेतकरी सुलभा व शंकरराव केशवराव कुट्रे यांच्या सौजन्यातून स्नेहभोजन होणार आहे.
तिसऱया सत्रात निमंत्रितांचे कवि संमेलन
दुपारी 2.45 वाजता तिसऱया सत्रात निमंत्रितांचे कवि संमेलन पार पडणार असून या कवी संमेलनात जितेंद्र लाड, अनंत विठ्ठल राऊत आणि तालिब सोलापुरी हे कवी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी भाग्योदय महिला को-ऑप. सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी परशराम निलजकर आणि वैशाली खडी मशीन कंग्राळी खुर्द प्रायोजक राहणार आहेत. चौथ्या सत्रात दुपारी 4 वाजता कथाकथन कार्यक्रमात जीवन आकाराम सावंत हे कथा सादर करणार आहेत. यासाठी एलआयसीचे प्रमुख व्यवस्थापक व्ही. जी. बिरादार आणि अडत व्यापारी बसवंत मायाण्णाचे प्रायोजक म्हणून राहणार आहेत.
संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कडोली मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.