प्रा. डॉ. दत्तात्रय पाटील : कारदगा येथे पत्रकार परिषद
वार्ताहर/ कारदगा
मानवी जीवनामध्ये मूल्यवर्धित जाणिवा रुजविण्याचे काम जे करते ते म्हणजे साहित्य. साहित्य हे ज्ञानाची भूक भागवण्याचे काम करते. साहित्य व समाज यांचा अनन्य संबंध आहे. साहित्य हा मानवी जीवनाचा सर्जनशील अविष्कार आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दत्तात्रय पाटील यांनी केले.
ते कारदगा येथील साहित्य विकास मंडळाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषद, व्याख्यान व विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी उदय पांगिरे हे होते. साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंडळामार्फत वर्षभरात राबविण्यात येणाऱया विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आतापर्यंत 24 संमेलने यशस्वी झाली असून यंदा पंचविसावे रौप्यमहोत्सवी संमेलन होणार होते. पण कोरोनामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी प्रा. डॉ. दत्तात्रय पाटील म्हणाले, साहित्यामध्ये केवळ समाजाची प्रतिमा दिसते असे नाही तर प्रत्येक कालखंडातील प्रतिबिंब साहित्यात पडत असते. आज कोरोना काळात वाचन चळवळीकडे पुन्हा प्रत्येकाचा ओढा वाढू लागला आहे. साहित्यापासून मिळणारा आनंद हा रसिकांचा आनंद असतो. सोशल मीडियाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याची गरज असून, श्रवण, वाचन, लेखन व चिंतन हे साहित्यातून निर्माण झाले असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थितांनी आपल्या कविता, कथा व अनुभव या ठिकाणी मांडले. या कार्यक्रमास मंडळाचे सचिव सूचित बुडके, खजिनदार सुभाष ठकाणे, बाळासो नाडगे, भाऊसो चिंदके, महादेव दिंडे, महावीर पाटील, प्रशांत खराडे, सदाशिव पारगावे, कल्पना रायजाधव, कुमार हेगडे, विजय कचरे, विनोद परीट, रावसाहेब सावंत, तुकाराम घुणके, संभाजी अलंकार, शिवाजी माने, रंगराव बन्ने, तानाजी बिरनाळे, संजय अवघडी, संजय नवनाळे यांच्यासहित विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्षा सुनिता कोगले यांनी आभार मानले.