प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवून फेरीवाले, खोके, टपरी व्यवसायिकांना हद्दापार केले आहे. या हद्दापारीने गळीगात्र झालेल्या या व्यवसायिकांनी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांची भेट घेऊन आपले गाऱहाणे मांडले आहे. कोरोनानंतर आता तर कुठे व्यवसायांना प्रारंभ केलाय…त्यामुळे साहेब पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका अशी विनंती केली आहे.
नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन शहरातील रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आली. त्या हटाव मोहिमेत शहरातील रस्त्यांवर, रहदारीस अडथळा ठरणाऱया सर्व टपऱया, खोके, हातगाडय़ा हटवण्याची धडक कारवाई झाली. या कारवाईने हे व्यवसाय करणारे सारे हवालदिल बनले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च 2020 पासून सुमारे 8 ते 9 महिने व्यवसाय बंद होते. या कालावधीत हे व्यवसायिक अत्यंत हलाखीचे जीवन जगत होते.
कोणतीही सरकारी वा इतरही मदत मिळाली नसल्याची कैफियत या व्यवसायिकांनी मांडली आहे. त्याबाबत कोणाकडे तक्रारही केली नाही. अशावेळी आताच कुठे सुमारे 15 दिवसांपूर्वी व्यवसाय सुरू केलेले होते. तर नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाने हटवण्याची कारवाई केली. त्यामुळे अक्षरशः कंबरडे मोडून टाकले आहे. अगोदरच लॉकडाऊनकाळात हलाखीत जगणे जगत असताना आता नव्याने सुरू झालेल्या या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक उभारी मिळेल ही आशा होती. पण ती देखील या कारवाईने पुरती धुळीस मिळाल्याचे सांगितले.
याबाबत सोमवारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांची या व्यवसायिकांनी भेट घेतली. सुनील शिवलकर, तुलशीदास कोठारकर, शुभम कीर, राहुल रसाळ, राजू पाथरे, प्रवीण भाटकर, संतोष देवडींग, सुभाष श्रीनाथ आदींचा यावेळी समावेश होता. नगर परिषद हॉकर्स झोन तयार करून भाडेतत्वावर जागा देणार असल्याचे बोलते, पण तोपर्यंत आम्ही व्यवसायिकांनी करायचे काय? असा सवाल करण्यात आला. आम्हाला अवाढव्य मोठे स्टॉल्स उभारण्यावर आपण अवश्य कारवाई करावी. पण आम्हा छोटय़ा व्यवसायिकांवर कोसळलेली उपासमारीची तलवार तातडीने दूर करा. गांभीर्याने यात न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या व्यवसायिकांनी केली आहे.