मीरा पोतदार/ चिपळूण
डिसेंबरच्या सुट्टय़ांमध्ये ताजेतवाने झालेले सिंगापूरकर दोन जानेवारीपासून नव्या वर्षात नव्या उत्साहाने कामाला लागतात. नवीन शैक्षणिक वर्षही दोन जानेवारीपासून सुरू होतं. पण हे ‘उंदीर मामाचं’ वर्ष जरा वेगळं ठरलं. चीनच्या वुहानमध्ये पसरलेल्या नव्या व्हायरसने लोकांना चिंतित करायला सुरुवात केली. मूळ चिपळूणच्या संज्योत मिश्रा-शेंबेकर, सिंगापूरहून ‘तरुण भारतशी बोलताना म्हणाल्या की 23जानेवारीला सिंगापूरमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला. सिंगापूर सरकार नेहमीच एक कदम पुढे असते. 22 जानेवारीलाच सिंगापूर कोरोनाला टक्कर देण्यासाठी योग्य निर्णय, नियोजन आणि प्रत्यक्ष कृतीसाठीचा मल्टी मिनिस्ट्रेरियल टास्क फोर्स तयार होता. 2002-3 च्या सार्सच्या अनुभवामुळे सिंगापूरला अशा प्रसंगासाठी सज्ज राहणे माहित होतं.
बघता बघता सिंगापूरच्या कोरोना केसेस वाढायला लागल्या आणि सात फेब्रुवारीला सरकारने येलो लेवल वरून ऑरेंज लेवल केली. सिंगापूरवासियांनी सगळी दुकानं अक्षरश: रिकामी केली. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान ली यांनी लोकांना धीर धरा सरकार कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे असा धीर दिला. ऑफिसमध्ये टेम्परेचर मॉनिटरिंग, सगळीकडे सॅनिटायझर्स, मास्क लावून वावरणारी माणसे… सगळं आपोआपच बदलून गेलं. आधी लोकांना वर्क फ्रॉम होमची मुभा आणि योग्यवेळी बंधनकारक केले.
काटेकोर नियोजनाचे उदाहरण
साधारण मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून बहुतेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. मुलांची शाळा मात्र चालू होती. मुलांना शाळेत पाठवताना रुमाल, वेट टीश्यू, ड्राय टीश्यू, थर्मामीटर, सॅनिटाझर आणि अगणित सूचना देऊन शाळेत पाठवणे सुरु झाले. पालक अस्वस्थ असताना शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की, अजून शाळा बंद करायची वेळ आली नाही. मुलं शाळा नसेल तर घराबाहेर खेळत राहतील व ते जास्त धोक्याचे ठरेल. याचवेळी सरकारी स्तरावर पूर्ण वेळ ऑनलाईन करण्यासाठीची पूर्ण तयारी सुरु होती. मग एक दिवस होम बेस्ड लर्निंगची रंगीत तालीम झाली. पालकांनी सिंगापूर सरकारचे शैक्षणिक पोर्टल डाऊनलोड केलं. ज्या पालकांना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेणं शाक्य नव्हतं अशांसाठी सरकारने डीव्हाईसची सोय केली आणि एप्रिलपासून सर्किट ब्रेकर सुरू झालं. शाळा घरून, अत्यावश्यक सेवा सोडून सर्व कामे घरून, एका घरात राहणारी माणसं सोडून दुसऱया कोणी एकमेकांना भेटायचं नाही. उगाचच घराबाहेर पडायचं नाही. अत्यावश्यक सेवेतील पालकांच्या मुलांसाठी देखरेखीची सोय, मोफत मास्क, सॅनिटाझरचा पुरवठा सुरु झाला.
सरकारचा सर्वांनाच दिलासा
सिंगापूरला गमतीने फाईन सिटी म्हणतात. कोणता कायदा मोडला, तर किती दंड भरावा लागेल हे स्पष्टपणे सांगितलं जातं. लोकही शक्यतो कायदा मोडत नाही. त्यामुळे सगळं सुरळीत सुरू आहे. एप्रिल येता-येता परदेशातून आलेल्या कामगारांमध्ये कोवीड 19 वेगाने पसरू लागला. त्या सगळ्यांची कामं बंद करताना वेतन नक्की देऊ ही पंतप्रधानांची ग्वाही. नोकरी-व्यवसायावर गदा न येण्याची शासनाची हमी महत्वाची म्हणायला हवी.
डिजिटल कुटुंबाला परंपरेची जोड
या सगळ्यात मुलांबरोबर खेळ व्यायाम गप्पागोष्टी कोडी सोडवणे यासारखा दुसरा आनंद नाही. दिवसभर ऑफिस आणि ऑनलाईन शाळा सांभाळताना थोडी तारांबळ होते. मुलांची गुगल मीट, मुलींची झुंबर हिंदी क्लास. ऑफिसची महत्त्वाची मीटिंग सुरू असताना नेमकी मुलांची असाइमेंट अपलोड होत नाही.. मग रडारड. आम्ही दोघं आपापल्या लॅपटॉपवर, मुलगा आयपॉड, मुलगी मॅकबूकवर असं डिजिटल कुटुंब झालंय. फिटनेस क्लासेस, म्युझिक क्लासेस.. सगळं ऑनलाईन. सगळा दिवस असा वेगवेगळय़ा ऍप्समध्ये खो-खो खेळत गेला की संध्याकाळी तोंडाला मास्क लावून मुलांना जॉगिंग, सायकलिंगला न्यायचं. आयत्याच आलेल्या संधीचं सोनं म्हणजे गुढीपाडवा ते हनुमान जयंती सलग पंधरा दिवसात मुलांना रामरक्षा शिकवली आणि आता तो नित्यपाठ झाला.
सर्व सुरक्षित हाच दिलासा
बाबा चिपळूणला एकटे, बहिणी मुंबईत. 2 एप्रिलचा सिंगापूर ते चिपळूण प्रवास ठरलेला. बाबांचे काळजी करणारे रोज फोन…. “कशाला येतेस एवढा प्रवास करून?’’ आणि माझा त्यांना दिलासा “काही होणार नाही’’. पण म्हणे म्हणेपर्यंत भारताने विमानसेवा बंद केली, आता कधी चिपळूणला यायला मिळेल माहित नाही. सगळेजण आपापल्या घरी सुरक्षित आहेत हाच मोठा दिलासा संज्योत मिश्रा-शेंबेकर यांना आहे.