लखबीरच्या समर्थनार्थ एकवटणारे शेतकरी टार्गेट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेतकरी आंदोलनस्थळी अलीकडेच हत्या झालेल्या लखबीर सिंह याच्या समर्थनार्थ एकवटलेल्या शेतकऱयांवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास सिंघू सीमेवर लाठीमार करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांच्या या कारवाईमुळे सिंघू सीमेवर गोंधळ निर्माण झाला होता.
काही दिवसांपूर्वी निहंगांनी लखबीर सिंगची निर्घृण हत्या केली होती. त्याचे हातपायही कापले गेले. या प्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे, मात्र तरीही हे प्रकरण जोर धरताना दिसत आहे. या प्रकरणामध्ये आता यूपी-उत्तराखंडमधील शेतकरी लखबीरला न्याय देण्याची मागणी करत आहेत. त्यांना सिंघू सीमेवर आवाज उठवायचा असल्याने बुधवारी तेथे बरेच जण एकवटले होते. यूपी आणि उत्तराखंडमधील शेतकऱयांना सध्या नरेला येथे थांबवण्यात आले आहे. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केल्यामुळे शेतकऱयांना पुढे जाता आले नाही. सिंघू सीमेवर शेतकऱयांची संख्या वाढल्यास संघर्ष आणखी वाढू शकतो, अशी भीती पोलिसांना वाटत आहे. अनेक महिन्यांपासून सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यातच आता इतर राज्यातून शेतकरी दाखल झाल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. अशा स्थितीत पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून येणाऱया शेतकऱयांना नरेला येथे थांबवले आहे.