प्रतिनिधी/ चिपळूण
महापुरामुळे चिपळूण शहरासह परिसराचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पूरमुक्त चिपळूणसाठी सर्व उपाययोजनांचा अभ्यास सुरू आहे. दुसऱया सिंचन आयोगानेही यापूर्वी काही निष्कर्ष काढले आहेत. त्या बाबत आपण राष्ट्रीय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शेखर निकम यानी ‘तरुण भारत’ला सांगितले.
कोयना अवजल चिपळुणात येते. त्या पाणलोट क्षेत्रात 11 ठिकाणी पुन्हा वीजनिर्मिती होऊ शकते, असा निष्कर्ष दुसऱया सिंचन आयोगाने काढला होता. अशा ठिकाणी वीजनिर्मिती झाल्यास वीजनिर्मिती क्षमता वाढवण्याबरोबरच प्रामुख्याने चिपळूणमधील पूरस्थितीवर मात शक्य असल्याचे मत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात आमदार निकम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कद्रेकर सर यांनी दिलेली माहिती महत्वपूर्ण आहे. चिपळूणच्या पूरमुक्ततेसाठी वेगवेगळय़ा स्तरावर अभ्यास सुरु आहे. दुसऱया सिंचन आयोगाचे निष्कर्ष व शिफारशी महत्वपूर्ण आहेत. वीजनिर्मिती व पूरनियंत्रण हे दोन्हीही यातून साध्य होणार असल्याने या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे आमदार निकम यांनी सांगितले.