साडेतीनशे वर्षाची परंपरा जपतायत सिंदखेडचे पठाण कुटुंब, हिंदू – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश
अमोल फुलारी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड या गावात आयुब बाबूलाल पठाण या दाम्पत्याने गेल्या साडेतीनशे वर्षांपासून आपल्या राहत्या घरी गौराई (लक्ष्मी ) बसवतात. हिंदू – मुस्लिम ऐक्याचा हा अनोखा संदेश पठाण यांनी यातून दिला आहे.
पठाण कुटुंब हे मंगरूळ ता. तुळजापूर येथील असून ५० वर्षांपूर्वी कामाच्या शोधत व पोटापाण्यासाठी सिंदखेड या गावी आले. मंगरूळ या ठिकाणी शेतात काम करत असताना फत्तुभाई पठाण यांना लक्ष्मीच्या गाठी सापडल्या. त्या नंतर त्यांनी जाणकारांना विचारून आपल्या घरी गौराई (लक्ष्मी) ची प्रतिष्ठापना केली. या गोष्टीला आज साडेतीनशे वर्षाचा काळ गेला पण पठाण कुटूंब आजही अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड गावी अत्यंत भक्तिभावाने व मनोभावे प्रतिष्ठापना करतो. विधिवत पूजा- अर्चा, नैवेद्य आरती करून नामस्मरण करतात.
आयुब पठाण व त्यांची पत्नी आयेशाबी हे दाम्पत्य गौराई आगमनवेळी संपूर्ण घराची स्वच्छता, रंगरंगोटी करत असतात. गौराईसाठी लागणारे कपडे, फळे, फराळाचे साहित्य यांची जमवाजमव करतात. सजावटीसाठी संपूर्ण कुटुंब या कामात व्यस्त असते. गौराई अगमनावेळी घरात व कुटुंबात आनंदाचे वातावरण असते.
सिंदखेड हे गाव बाराशे लोकवस्तीचे छोटेसे गाव असून गावात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक जातीच्या सण उत्सवात एकत्रित येऊन अनेक सण साजरे करतात. जात धर्म पंथ वंश असा भेद न मानता सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन हिंदू – मुस्लिम समाजातील सण उत्सव भक्तिभावाने साजरे करतात.
ईश्वर हा सर्वव्यापी
आमच्या पाच पिढ्यापासून गौराई ( लक्ष्मी )आगमन पूजन करत आहोत. कोणताच भेद आम्ही पाळत नसून सबका मलिक एक या प्रमाणे ईश्वर हा सर्वव्यापी आहे. आणि ईश्वर एकच आहे. मग आपण का भेदभाव पाळायचा. आम्ही जातीभेद अजिबात पाळत नाही. ज्या दिवसापासून आम्ही घरात गौराई बसवतो तेव्हापासून आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडली नाही. अगदी आनंदाने व समाधानकारक जीवन व्यतीत करत आहोत. – आयुब बाबूलाल पठाण, सिंदखेड ता. अक्कलकोट
परंपरेत खंड पडू देणार नाही
गौराई आगमनवेळी आम्ही सर्व कुटूंब एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात.आमच्या कुटुंबात या वेळी खूप आनंदाचे वातावरण आहे. पाच पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आजही निरंतर चालू आहे आणि पुढे ही चालू राहणार आहे. यात कधीही खंड पडू देणार नाही. गौराई अगमनावेळी आनंद होतो तर विसर्जनवेळी मनोमनी दुःख होतो – आयेशाबी आयुब पठाण