पालकमंत्री उदय सामंत यांची देवगडला माहिती : जिल्हय़ात आरोग्य विभागाचे चांगले काम! : बाहेरुन येणाऱया भाजी विक्रेत्यांवर लक्ष ठेवा!
प्रतिनिधी / देवगड:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सद्यस्थितीत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. आरोग्य विभागाचे खूप चांगले काम आहे. जनता शासनाचे नियम पाळत आहे मात्र, एक टक्का लोकांच्या वागणुकीमुळे 99 टक्के लोक अडचणीत येऊ शकतात. सिंधुदुर्गातील जनतेचे चांगले सहकार्य असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत आहे, अशी माहिती जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी देवगड तालुक्याला भेट देऊन तहसील कार्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांची माहिती घेऊन अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, माजी तालुकाप्रमुख ऍड. प्रसाद करंदीकर, राष्ट्रवादीचे नंदकुमार घाटे, काँग्रेसचे उल्हास मणचेकर आदी उपस्थित होते. तसेच तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाला, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले आदी उपस्थित होते.
लोक पॅनिक होणार नाहीत याची काळजी घ्या!
कोरोनाचा प्रभाव राज्यात व देशात वाढल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढल्यामुळे लोक पॅनिक होणार नाहीत, याची दक्षता पोलीस व तहसीलदार यांनी घ्यावी. लोकांनी बाजारामध्ये आले तरी त्यांनी सोशल डिस्टन्सी पाळून खरेदी करावी. दुकानदारांनी देखील सोशल डिस्टन्सींचे काटेकोर पालन करावे. लोकांना जास्तीत जास्त घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करावा. बाहेरून येणाऱया भाजी विक्रेत्यांवर लक्ष ठेवा, अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी दिल्या.
मासेमारी लिलावाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ
लॉकडाऊनमुळे मासेमारी व्यवसायाला अडचणी येत आहेत. मासळी लिलावाचा प्रश्न निर्मेण झाला आहे. लिलाव झाला नाही तर मच्छीमारांना मासळीची योग्य किंमत मिळणार नाही, अशी कैफियत मच्छीमार नेते भाई खोबरेकर यांनी मांडली. या बाबत बोलताना सामंत म्हणाले, ज्या महिला मासे विक्री करीत आहेत, त्यांनी सोशल डिस्टन्सी बाळगूनच मासे विक्री करावी. त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, मासे लिलावाच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हा प्रश्न जिल्हय़ातील मच्छीमारांचा आहे. यासाठी प्रमुख मच्छीमारांची व्हीडीओ कॉन्फरन्स घेऊन यातून योग्य मार्ग काढू, असा दिलासा त्यांनी दिला. मासेमारी हंगाम संपत आला असल्याने अनेक मच्छीमार होडय़ा बाहेर काढण्यात सुरुवात करीत आहेत. त्यांनी सोशल डिस्टन्सी व एका दिवशी एक किंवा दोन बोटी काढण्यात याव्यात. बोटी काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा, असेही सामंत यांनी सांगितले.
लॉकडाऊन संपल्याशिवाय जप्त वाहने मिळणार नाहीत
लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱया देवगडमध्ये 28 गाडय़ा जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कातीवले यांनी दिली. यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, जप्त केलेल्या गाडय़ा लॉकडाऊन संपेपर्यंत देण्यात येऊन नयेत, अशा सूचना दिल्या. विनाकारण वाहने चालविणाऱयांवर मोहीम कडक करण्याच्या सूचनाही दिल्या. शहरामध्ये स्वयंसेवक व घरपोच सेवेच्या नावावर ज्यांनी पास घेतले आहेत त्यांच्याकडून दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांचे पास चेक करून तसेच खात्री करूनच त्यांना सोडण्यात यावे. अन्यथा दुरुपयोग करणाऱयांवर कारवाई करावी.
शिवभोजन थाळय़ांची संख्या वाढविणार
देवगड तालुक्यामध्ये जामसंडे येथे शिवभोजन थाळी दिली जात आहे. दिवसाला 50 थाळय़ा दिल्या जात असून जर थाळय़ा कमी पडत असतील तर वाढवून दिल्या जातील. मात्र, कोणालाही उपाशी ठेवले जाणार नाही. जामसंडेबरोबर देवगडमध्येही शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्याचा विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपंचायतींना तीन लाखाचा निधी
जिल्हय़ातील नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्रत्यंकी तीन लाखाचा निधी कोरोना उपाययोजनांसाठी मंजूर केला आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी देवगडसह चार न. पं. ना निधी मिळालेला नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी प्रस्ताव उशिरा आल्याने निधी दिला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. मात्र, 27 मार्चला प्रस्ताव पाठविलेला असल्याने त्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्या, अशा सूचना त्यांनी नगरविकास विभागाला दिल्या.
निधीचे राजकारण करू नका!
जिल्हय़ातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्रत्येकी तीन लाख निधी दिला असून या निधीतून जनतेला आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक त्या गोष्टींचा पुरवठा करावा. मास्क वाटप झालेले असल्याने 4 डेटॉल साबण किंवा अन्य काही देण्याचा प्रयत्न करावा. जनतेला चागले काहीतरी वाटप करा. वाटप करताना कुटल्याही पक्षाचे चिन्ह अथवा व्यक्तींचा उपयोग करून घेऊ नका. हा शासनाचा पैसा आहे त्यामध्ये राजकारण होता कामा नये, अशा सूचना मुख्याधिकाऱयांना दिल्या.
चिरेखाण व घर बांधणीचा निर्णय दोन दिवसांत घेणार
जिल्हय़ात चिरेखाणी बंद असल्यामुळे अनेक घरांची कामे रखडली आहे. पावसापूर्वी ही कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे चिरेखाण व्यवसाय व घर दुरुस्तीबाबत निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल. चिरेखाण व्यावसायिकांना चिरे उत्खननाची परवानगी मिळेल. पण, चिरे वाहतूक करता येणार नाही. ती परवानगी टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असेही ते म्हणाले.