तेजस देसाई / दोडामार्ग
कॅनडामधील ओटावा शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राहत असलेल्या व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यामातून सामाजिक कार्य करणाऱया मूळ सिंधुदुर्गातील कळणे गावच्या सुकन्या सुवर्णा देसाई-हिरेमठ यांनी कॅनडात आपण राहत असलेल्या राज्यात आणीबाणी जाहीर करण्याची परिस्थिती ओढावल्याचे सांगत आपल्या भारत देशात असा प्रसंग आला नाही, हे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. भारतवासीयांनी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी उचललेल्या पावलांचेही त्यांनी कौतुक केले.
कॅनडामध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण 15 जानेवारीला ब्रिटिश कोलंबिया प्रोव्हीन्स राज्यामध्ये आढळला. त्यानंतर सर्व राज्यांमध्ये झपाटय़ाने कोरोना पसरत गेला. आजपर्यंत कॅनडामध्ये 15 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर साधारण 280 रुग्णांचा बळी गेला आहे. आम्ही राहत असलेल्या ओंटारिओ राज्यामध्ये चार हजारावर रुग्ण आहेत. वरवर पाहता व इतर देशांच्या तुलनेने हे नगण्य वाटत आहे. परंतु योग्य काळजी न घेतल्यास हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती सुवर्णा यांनी व्यक्त केली.