57 ठिकाणे : ‘सिंधुदुर्ग वेटलँड’ फेसबूक पेजवर ऑनलाईन : भारतातील पहिलेच संकेतस्थळ
प्रतिनिधी / मालवण:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाला निसर्गाने भरभरून दिले. जिल्हय़ातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे. काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्हय़ातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगांनी जिल्हय़ाचे नुकसान झाले आहे. जिल्हय़ात समुद्री किनारी, भरतीमुळे निर्माण झालेला भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे आणि गवताळ अन दलदलीची 273 ठिकाणे आहेत. या व्यतिरिक्त ठिकाणे असू शकतील. त्यातील वेटलँड प्रकारात येणाऱया 57 पाणथळ जागांच्या सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जिल्हय़ातील पाणथळ जागांची माहिती ‘सिंधुदुर्ग वेटलँड’ संकेतस्थळास मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे. याचे उद्घाटन 15 ऑगस्टला ‘सिंधुदुर्ग वेटलँड’ फेसबूक पेजवर ऑनलाईन होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 57 पाणथळ जागांचे सर्वेक्षण पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले असून हे सर्व्हेक्षण तत्कालीन जिल्हाधिकाऱयांनी सत्यापित करून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. आता हे सर्वेक्षण जिल्हय़ातील लोकांसमोर आणले जात आहे. गावातील सजग नागरिकांनी आपला गाव, आपला परिसर जाणून घेण्याची गरज आहे, असे सिंधुदुर्ग वेटलँड समिती सदस्य प्राध्यापक हसन खान यांनी स्पष्ट केले. मालवण : पाच, कुडाळ : सतरा, सावंतवाडी : आठ, वेंगुर्ले : एक. दोडामार्ग : दोन, कणकवली : अकरा, देवगड : एक, वैभववाडी : चार एवढय़ा पाणथळ ठिकाणांचा समावेश आहे. वेटलँड समितीच्या माध्यमातून जिल्हय़ातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गिक जलस्तोत्रांचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपापल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे, या हेतूने जिल्हय़ातील पर्यावरण प्रेमींनी ‘सिंधुदुर्ग वेटलँड’ असे जिल्हय़ातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले. नीलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठोरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठोरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. राज्यात एकूण 21 हजार 668 पाणथळ जागा असून 10 लाख 14 हजार 522 हेक्टर क्षेत्र त्याखाली आहे. भौगोलिक क्षेत्राच्या 3.3 टक्के इतके हे क्षेत्र आहे. जलाशयाखाली 36.29 टक्के, तलावाखाली 20.57 टक्के, नदी-ओहोळांतर्गत 29.54 टक्के, खाडीखाली 4.10 टक्के, तर कांदळवनाखाली 2.18 टक्के इतके क्षेत्र आहे.
15 ऑगस्टला होणार उद्घाटन
पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दाटीने महत्त्व असलेल्या जिल्हय़ातील 50 पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतूने ’सिंधुदुर्ग वेटलँड’ शीर्षकाखाली पर्यावरण प्रेमीनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लाँचिंग 15 ऑगस्टला सायकांळी 4 वाजता वेटलँड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे. पाणथळ जागांबाबत जागृती नसणे आणि कायद्याचे अज्ञान ही पाणथळ जागा नष्ट होण्यामागची कारणे आहेत. परंतु ताज्या पाण्याच्या तुटवडय़ाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागण्यासाठी पाणथळ नैसर्गिक स्त्राsतांचे संवर्धन नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती घेणे आवश्यक आहे, असे ऍड. ओमकार केणी यांनी स्पष्ट केले.
‘कोकण वेटलँड’ची स्थापना
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने पाणथळ जागा संरक्षण हेतूने कोकण वेटलँड मंचची स्थापना करण्यात आली आहे. पाणथळ जागा उल्लंघन संदर्भात लेखी तसेच फोन, इमेलद्वारे तक्रार आल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी 48 तासांच्या आत ठिकाणाची पाहणी करून उल्लंघन पूर्वस्थितीत आणण्यासोबत उल्लंघन करणाऱयावर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे.