केरळच्या धर्तीवर यांत्रिकीकरणाचा वापर करून पहिल्यांदाच भात लावणी
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
केरळप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये ‘ग्रीन आर्मी प्रोजेक्ट’ राबवण्यास सुरुवात झाली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत भातशेती करण्यासाठी यांत्रिकीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे. ‘चांदा ते बांदा’ योजनेंतर्गत वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रामार्फत ग्रीन आर्मी प्रोजेक्ट राबविण्यासाठी सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कुडाळ तालुक्यातील आंबेरी व सावंतवाडी तालुक्यातील हुमरस येथे यंत्राद्वारे भात लावणी लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. भात लावणीची यंत्रेही सिंधुदुर्गात उपलब्ध करण्यात आली आहेत.
मनुष्यबळाच्या अभावामुळे दिवसेंदिवस भातशेतीकडे लोकांचा कल कमी होत चालला आहे. मनुष्यबळाच्या अभावाला पर्याय म्हणजे यांत्रिकीकरणाद्वारे भातशेती करणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरणाद्वारे शेती करणे आर्थिकदृष्टय़ाही परवडते आणि शेतीही किफायतशीर होते. पारंपरिक पद्धतीने नांगरणी करून भातशेती करायची, तर वर्षभर जनावरांची जतन करावी लागते. ते आता परवडत नाही. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून यापूर्वीच पावर टीलरने नांगरणी करून भातशेती करायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर भात कापणीपासून मळणी करेपर्यंत यंत्राचाच वापर करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र भात लावणीसाठी सिंधुदुर्गात कुणी यंत्राचा वापर करीत नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून चांदा ते बांदा योजनेंतर्गत कृषी विभागाकडून यांत्रिकीकरणावर भर देण्यास सुरुवात होऊन सिंधुदुर्गात पहिल्यांदाच यावर्षी भात लावणी लागवडीची यंत्रे उपलब्ध केली आहेत.
मनुष्यबळाचा कमी वापर
पावर टीलरने नांगरणी करून भातशेती केली, तरी भात कापणीला मनुष्यबळ अधिक लागते आणि ते सध्या उपलब्ध होत नाही किंवा मनुष्यबळ मिळाले, तरी मजुरीही वाढली आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नाही. मात्र यांत्रिकीकरणाद्वारे भातशेती केल्यास कसे किफायतशीर आहे, हे पटवून देण्यात येत आहे. चांदा ते बांदा योजनेंतर्गत वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रामार्फत ग्रीन आर्मी प्रोजेक्ट राबविली जात असून अन्न सुरक्षा दलाच्या सदस्यांमार्फत प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत. केरळने पर्यटनाबरोबर भातशेती उत्पादनामध्ये ही भरारी घेतली आहे. त्याठिकाणी मनुष्यबळाला पर्याय म्हणून यांत्रिकीकरणाचा स्वीकार करून सर्वत्र ग्रीन आर्मी प्रोजेक्ट राबविला जात आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत यांत्रिकीकरणाद्वारे केलेली शेती आर्थिकदृष्टय़ा खूपच किफायतशीर ठरत आहे. वेळेची व पैशाची बचत होत आहे. त्यामुळे ग्रीन आर्मी प्रोजेक्ट यशस्वी ठरला आहे. भातपिकाच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. याच धर्तीवर आता सिंधुदुर्गात ग्रीन आर्मी प्रोजेक्ट राबविली जात आहे.
भात लावणीची यंत्रे उपलब्ध
या प्रोजेक्ट अंतर्गत चांदा ते बांदा योजनेमधून भात लावणीची यंत्रे उपलब्ध करून कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथील विजय खोचरे व सावंतवाडी तालुक्यातील हुमरस येथील किसन धुरी यांच्या शेतावर अन्न सुरक्षा दल सदस्यांनी यंत्राच्या सहाय्याने भात लावणी लागवड कशी करावी, त्याला लागणारी उत्तम दर्जाची रोपवाटिका या विषयावर प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. एन. सावंत, चांदा ते बांदा सह प्रकल्प प्रमुख डॉ. व्ही. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चांदा ते बांदा योजनेचे समूह प्रमुख प्रवीण मर्तल, गटप्रमुख रुपेश सावंत यंत्र चालक विठ्ठल गावडे आणि अन्न सुरक्षा दल सदस्यांनी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.
अठरा शेतकऱयांकडून खरेदी
यंत्राद्वारे भात लावणी एवढी किफायतशीर आहे की, एका दिवसात एक एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी करता येते आणि त्यासाठी डिझेलसाठी फक्त 250 रुपये खर्च येतो. म्हणजे मनुष्यबळाचा वापर करून लावणीला पाच-दहा दिवस लागतात, तीच लावणी एका दिवसात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात सद्यस्थितीत अठरा शेतकऱयांनी ही यंत्रे घेतली असून त्यांच्या शेतात यावर्षी प्रात्यक्षिके करून दाखविली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हय़ात सर्व शेतकऱयांना यांत्रिकीकरणाच्या वापराबाबत मार्गदर्शन करून ग्रीन आर्मी प्रोजेक्ट राबविला जाणार आहे. भात लावणीपासून रोपवाटिका निवडणे, कोळपणी करणे, कापणी, मळणी करेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्रवीण मर्तल यांनी ‘तरुण भारत’ला दिली.