कणकवलीत आढळला रुग्ण : ‘कंटेन्मेंट झोन’ घोषित : घरीच उपचार : दोनशे लोकांचा सर्व्हे
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात ‘डेल्टा प्लस’ या कोविड-19 प्रकारातील पहिला रुग्ण कणकवली-परबवाडी येथे आढळला आहे. त्यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. त्या रुग्णावर घरीच उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. परबवाडा येथे कंटेन्मेंट झोन घोषित करून दोनशे लोकांचा सर्व्हे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी मंगळवारी दिली.
‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकारातील राज्यात 21 रुग्ण आढळले असून यापैकी एक रुग्ण जिल्हय़ात कणकवली-परबवाडी येथे आढळला आहे. जिल्हय़ातील हा पहिला रुग्ण आहे. कोविड-19 या विषाणूमधीलच अधिक वेगाने पसरणारा आणि अधिक घातक असणारा असा डेल्टा प्लस विषाणू आहे.
या विषाणूवर लसीचा कोणताही परिणाम होत नाही. तसेच या प्रकाराची तपासणी मुंबई येथील संशोधन केंद्रात होते. ही तपासणी करण्यासाठी या संशोधन केंद्रातील कर्मचारी स्वतः येऊन तपासणी करतात. सिंधुदुर्ग जिल्हय़ात अशीच तपासणी करण्यात आली होती. यात हा रुग्ण सापडला आहे. या रुग्णाला कोणतीही ट्रव्हल हिस्ट्री नाही. मात्र ट्रव्हल्स हिस्ट्री असणाऱया रुग्णाच्या संपर्कात येऊन डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. त्यामुळे तो रुग्ण कुणा-कुणाच्या संपर्कात आला आणि त्या रुग्णाच्या संपर्कात कोण-कोण आले, याचा शोध घेण्यात येत आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णाचे इतर नातेवाईकही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र हे नातेवाईक डेल्टा प्लस नसल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले.
हा रुग्ण सापडलेल्या कणकवली परिसरातील संबंधित भाग कन्टेन्मेंट झोन करण्यात आला असून या परिसरातील दोनशे लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. असेही जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू
बाधित भागात ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. पाटील यांना दिली. त्यांनी म्हटले आहे की, ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 बाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. त्याचबरोबर कोविड-19 चे लसीकरणही करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांनी कोविड-19 साठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील वैयक्तिक सुरक्षेबाबत नियमित हात धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीचे नियमित पालन करावे आणि ही महामारी आटोक्मयात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले आहे.