सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / कुडाळ:
जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याने जिल्हय़ात ‘जनता कर्फ्यू’ लागू करा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनादारे केली आहे. प्रेमानंद देसाई, दादा साईल आणि संजय शिरसाट यांनी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ‘कोविड-19’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर येणाऱया चाकरमान्यांना किंवा आपल्या गावात घरगुती गणपती उत्सव साजरा करण्यासाठी दिलेल्या सवलतीमुळे गेल्या साडेपाच महिन्यांत केवळ नाममात्र असणारे कोरोना पॉझिटिव्ह एवढेच नव्हे, तर पूर्वी रुग्ण बरा होण्याचा असलेला रेपो रेट बदलून मृत्यू होण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढलाय, ही अत्यंत चिंताजनक बाब सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी होत आहे. यातून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेला दिलासा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा ‘जनता कर्फ्यू’ची मागणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा सरपंच संघटनेच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.