एसआरपीएफची कुमक मागविली : मनाई आदेशही जारी – जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य आणि राणेंना झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हय़ात शिवसेना व भाजपमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी संपूर्ण जिल्हय़ात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एसआरपीएफची पोलीस कुमकही मागविण्यात आली असून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मंगळवारी येथे दिली.
राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकमध्ये राणेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली गेली तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक होत राणेंच्या अटकेसाठी आंदोलने सुरू केली. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही त्याचे पडसाद उमटले व शिवसेनेने आंदोलने सुरू केली. त्यानंतर राणेंना संगमेश्वर येथे रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपने आंदोलन सुरू केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध संघर्ष करून वाद निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हय़ात सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या जादा पोलीस कुमकही बंदोबस्तासाठो तैनात करण्यात येत आहेत. तर मुंबई पोलीस अधिनियम 37 (1) (3) प्रमाणे संपूर्ण जिल्हय़ात मनाई आदेश लागू करण्यात आले असून पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊन जमाव करता येणार नाही. सभा, मिरवणुका काढता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिली. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला जिल्हय़ातील परिस्थिती पाहूनच परवानगी दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.