कोरोनाला रोखले, मात्र माकडतापाचे रुग्ण वाढले : 28 रुग्ण सापडले
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असताना माकडतापाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत माकडतापाचे 28 रुग्ण सापडले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी गंभीर दखल घेत माकडताप नियंत्रणाच्या सूचना आरोग्य अधिकाऱयांना दिल्या आहेत. माकडताप नमुने तपासणीसाठी जि. प. चे वाहन उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी जि. प. ची आरोग्य यंत्रणा उत्तम प्रकारे काम करीत असल्याबद्दल म्हापसेकर यांनी सर्व आरोग्य यंत्रणेचे खास अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्याकडून माकडतापाचा आढावा घेतला असता माकडतापाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले. गेल्या दोन महिन्यांत माकडतापाचे 28 रुग्ण आढळले, तर तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.
माकडताप संशयित रुग्णांच्या रक्त तपासणीसाठी ते सॅम्पल सध्या मिरज येथे पाठविण्यात येत आहे. मणिपाल येथील लॅब बंद झाल्याने शासनाने या तपासणीचे सॅम्पल मिरज येथे पाठवावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार आठवडय़ातून दोनवेळा रुग्णांची सॅम्पल्स मिरज येथे पाठविली जातात. या तपासणीला विलंब होत असल्याचे व रिपोर्ट विलंबाने येत असल्याचे निदर्शनास येताच म्हापसेकर यांनी आठवडय़ातून किमान तीनवेळा ही सॅम्पल्स मिरजला पाठवावीत, असे आदेश दिले.
माकडतापाच्या पार्श्वभूमीवर रक्त नमुने तपासणीला विलंब लागत असल्याने अहवाल येईपर्यंत वाट बघत न बसता माकडतापांच्या रुग्णांवर योग्य ते औषधोपचार सुरू करावेत आणि जिल्हय़ात माकडतापाने पुन्हा कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावेत. तसेच रक्तनमुने आठ-आठ दिवसांनी तपासणीसाठी न पाठवता एक दिवस आड करून पाठवावेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाहन उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचनाही म्हापसेकर यांनी दिल्या.