शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केंद्राविरोधात निदर्शने : जिल्ह्यात बहुतांश बाजारपेठा सुरू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्रतिसाद मिळाला नाही. काही ठराविक दुकाने वगळता जिल्हय़ातील व्यापाऱयांनी बाजारपेठा बंद न ठेवता काळय़ा फिती लावून पाठिंबा दिला. तर ‘भारत बंद’ला पाठिंबा देत महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनेक ठिकाणी जोरदार निदर्शने केली. विविध शेतकरी संघटनांनी शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीची निवेदने दिली.
केंद्र सरकारने बनवलेल्या शेतकरी कायद्याविरोधात संपूर्ण देशभर गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलकांना रोखण्यात आले. त्यानंतर 8 डिसेंबरला ‘भारत बंद’चा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. देशातील विरोधी पक्षांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला होता. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही शेतकरी संघटना व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. व्यापारी संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला होता.
‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र जिल्हय़ात काही ठराविक ठिकाणीच दुकाने बंद होती, बहुतांश बाजारपेठा सुरू होत्या, व्यापाऱयांनी काळय़ा फिती लावून ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला. सत्यशोधक संघटना, शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱयांनी केंद्र सरकारने बनविलेला शेतकरी कायदा शेतकऱयांसाठी जाचक असल्याने तो रद्द करावा, अशी मागणी करणारी निवेदने प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना देण्यात आली.
सावंतवाडीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेनेचे जयेंद्र परुळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी तसेच अन्य पदाधिकाऱयांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच जिल्हय़ात ठिकठिकाणी ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर शेतकरी कायद्याविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
मालवणातील जलक्रीडा 100 टक्के बंद
मालवण : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मालवण किनारपट्टी मात्र सुनी-सुनी होती. किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा 100 टक्के बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच किल्ला होडी सेवा वाहतूकही बंदच होती. बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांची भेट घेतल्यानंतर मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला होता. व्यावसायिक मुंबईत असतानाही त्यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मालवण तालुक्यातील किनारपट्टीवर करण्यात आली होती.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या जलक्रीडा व्यावसायिकांनी सोमवारी राज्याचे बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन जलक्रीडा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. शेख यांनी शिष्टमंडळास जलक्रीडांसाठी लवकरच आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे व राज्य सरकारचा बंदर विभाग व पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून जलक्रीडा व्यवसायाशी निगडीत विविध परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सोपी व सुलभ करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे महिंद्र सावंत, अरविंद मोंडकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर, गोपाळ चोपडेकर, अन्वय प्रभू, मनोज मेथर, सचिन पराडकर, अमृत राऊळ, सन्मेष परब, हेमंत चिंदरकर, केतन तोरसकर, स्वप्नील मोंडकर, अरविंद खानविलकर, संजय मयेकर, समीर सारंग, पांडू कुमठेकर, विकी खोबरेकर, भूषण मयेकर, प्रीतम मयेकर, प्रशांत मळेकर, प्रमोद डोर्लेकर, विशाल साखळे, राजेश नाईक, दत्तराज कोरगावकर, नरहरी परब, शंकर मुंबरकर, शैलेंद्र सावजी, संतोष शेलटकर व इतर जलक्रीडा व्यावसायिक उपस्थित होते.