गोव्याच्या सीमा खुल्या : सिंधुदुर्गचा विनाअट प्रवेश काही मिनिटापुरता : गोव्यात प्रवेशासाठी सीमेवर रांगा : गोव्यातील सर्व आस्थापना सुरू : नोकरी जाण्याच्या भीतीने युवक-युवती वैफल्यग्रस्त
मयुर चराटकर / बांदा:
सिंधुदुर्ग जिह्याच्या सीमेवरील युवक रोजगारासाठी गोव्यात हजारोच्या संख्येने जातात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले साडेचार महिने या भागातून दररोज ये जा करणाऱया हजारो युवकावर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. त्यातच गोवा सरकारने आपल्या राज्यात येण्याचे आणि बाहेर जाण्याचे सर्व दरवाजे खुले केल्याचे वृत्त ऐकून हा बेरोजगार तरुण काहीसा आशेवर होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोवा राज्य सरकारने गोव्यात येणाऱयांसाठी गोव्याचे मार्ग मंगळवारपासून खुले केले असले तरी सिंधुदुर्ग प्रशासनाने मात्र अद्याप विनाअट गोव्यातून सिंधुदुर्गमध्ये प्रवेश मात्र काही मिनिटे सुरू केला आणि तो परत बंद पाडला. सद्यस्थितीत वरिष्ठांकडून कोणतीही सूचना न आल्याचे तेथील अधिकारी सांगतात.
आरोग्य असो वा रोजगार सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्गमधील हजारो युवक नेहमी ये-जा करत रोजगारासाठी गोव्यात जात असत तर आपल्या जिह्याची आरोग्ययंत्रणा काय आहे, हे सर्वश्रुत आहे. असे असताना संपूर्ण जिल्हा आरोग्यासाठी बांबोळी-गोवा येथे धाव घेतो. कोरोनाच्या संकटात मार्चपासून ऑगस्टपर्यंत गोव्याला जाण्यासाठी कडक नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. दरम्यान, प्रवेश असल्यास योग्य ती कार्यवाही पूर्ण करून प्रवेश दिला जात असे. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार गोवा सरकारने आपल्या राज्याच्या सर्व सीमा सर्वांसाठी खुल्या केल्या आहेत. मात्र, असे असताना कोरोनाबाबत आवश्यकती काळजी घ्यायची, असे मत सुद्धा मांडले आहे. याला मंगळवारपासून सुरुवातही केली. जरी गोव्याने सर्व काही सुरू केले असले तरी सिंधुदुर्ग प्रशासनाने मात्र कडक तपासणी सुरू ठेवली असल्याने गोव्यात जाऊन येणाऱयांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
युवकावर बेरोजगारीचे संकट
गोव्यात सर्वकाही सुरू झाले असल्याने तेथील सर्व कंपन्या मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्या आहेत. तेथील कंपन्यांमध्ये असलेले येथील युवकांना त्याच्या आस्थापनेतून विचारणा केली जात आहे. कंपनीत हजर न झाल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही दिली जात आहे. या भागातील चार तालुक्यातील सुमारे 10 हजाराहून अधिक युवक-युवती नोकरीसाठी गोव्यातून सिंधुदुर्ग अशी ये जा करतात मात्र सीमेवर कडक तपासणी व विलगीकरण असे नियम असल्याने त्यांना जाता येत नाही. त्यातच गोव्यात नोकरीसाठी जाणाऱयांना एसटी बसचा आधार होता. मात्र, एसटी सेवा पण बंद असल्याने त्या युवती सुद्धा गोव्यातून कसे ये जा करणार हा प्रश्न आहे. जर याबाबत योग्य तो निर्णय जिल्हा प्रशासनाने न केल्यास सिंधुदुर्गवर मोठे बेरोजगारीचे संकट कोसळणार हे मात्र नक्की.
देशभरातील अनेकजण रोजगारासाठी गोव्यात परतले
आज दिवसभरात देशाच्या विविध भागातील युवक खासगी वाहनाने नोकरीसाठी परत गोव्यात परतले. त्यांना कंपनी आस्थापनेकडून सांगितल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा आपल्या गावाकडून मिळेल त्या वाहनांने नोकरीसाठी गोव्याचा मार्ग पत्करला. आज दिवसभरात हजारोंच्या संख्येने युवक आपल्या कुटुंबासह गोव्यात परतले.
आरोग्याचा प्रश्न सुटणार
सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे, याचा अनुभव प्रत्येकाला नेहमीच येत असतो. त्यातच अतिजोखमीच्यावेळी सिंधुदुर्गवासियांना बांबोळीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, कोरोना दरम्यान येथून गोव्यात खासगी दवाखान्यात जाणायांची सुद्धा मोठी फरफट तपासणी नाक्यावर पाहायला मिळाली. अनेक रुटीन चेकअप जाणारे परतून सुद्धा गेले तर अनेकांनी कोरोनाची चाचणी आवश्यक असल्याने गोव्यात जाणे टाळले. मात्र, आता गोव्यातून सीमा खुल्या करण्यात आल्याने आरोग्याच्या बाबतीत असलेला प्रश्न सुटणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचे औत्सुक्य
सुरुवातीच्या काळात 28, मग 14, मग 10 अशा प्रकारे विलगीकरण नियमात जिल्हाप्रशासनाने राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार बदल केले असताना युवकाच्या रोजगाराचा प्रश्न असो किंवा गोव्यात असणारे सुविधा असो या पार्श्वभूमीवर गोव्यातून येणाऱयांसाठी काहीतरी नियमावली तात्काळ जाहीर करणे गरजेची होती. जिल्हा प्रशासनाने आपली नियमावली जाहीर केल्यानंतर गाव पातळीवर नियमावली काय ठरणार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. मात्र, या सगळय़ात रोजगाराच्या प्रश्नाबाबतही पूरक विचार करणे गरजेचे आहे.
अद्याप कोणताही निर्णय नाही- तहसीलदार
गोव्यातून येणाऱया प्रत्येकाची तपासणी करूनच त्याला प्रवेश देण्यात येणार असून सर्व नियम त्याला लागू असणार आहे. सर्व तपासणी नाके खुले करण्याबाबत आमच्याकडे कोणत्याही सूचना आल्या नाही, असे सावंतवाडी तहसीलदारांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.