ओटवणे/ प्रतिनिधी-
सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने कोरोना संकट पाठोपाठ तौक्ते चक्रीवादळात घर जमीनदोस्त झालेल्या गरजूंना मदत केल्यानंतर पूरग्रस्तांच्या मदतीलाही ही संस्था धाउन आली. तेरेखोल नदीच्या पुराचा फटका बसलेल्या दोन पूरग्रस्तांना या प्रतिष्ठानच्या वतीने ५०,००१ आणि १२,००१ रुपयांची मदत करण्यात आली.
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने गेल्या दिड वर्षात कोरोना काळात कोरोना प्रतिबंधात्मक, आरोग्य विषयक व प्रबोधनात्मक अनेक उपक्रम राबविले. मालवण तालुक्यातील कोळंब येथील नरहरी विष्णू परब या गरीब व्यक्तीचे तौक्ते चक्रीवादळात घर जमीनदोस्त झाले. ते मदतीच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती मिळताच त्यांना निवाऱ्यासाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने मदतीचा हात देताना त्यांना पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच श्री परब यांच्या घराच्या पुढील कामासाठी यापुढेही मदत करण्याचा मनोदय प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांनी व्यक्त केला.
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरून माडखोल धवडकी येथील मनोहर तुकाराम पारधी यांचा संगणक, फोटो प्रिंटर, ऑफसेट मशीन, लॅमिनेशन मशीन, मास्टर हिटर, स्टेशनरी व इतर साहित्य पुराच्या चिखल व पाण्यामुळे खराब झाले, यात त्यांचे सुमारे साडेचार लाख रुपयाचे नुकसान झाले. तर ओटवणे कापईवाडी येथील विठोबा न्हानू वरेकर यांच्या घराला तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्याने वेढल्याने घर जमिनदोस्त झाले.
या दोन्ही पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची गरज लक्षात घेऊन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अधक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे व सिंधु मित्रांनी या पूरग्रस्तांच्या घरी भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना मदत देण्याचे निश्चित केल्यानंतर या दोन्ही पूरग्रस्तांना मदतीचे धनादेश देण्यात आले. प्रतिष्ठानच्या अनपेक्षित मदतीमुळे पारधी व वरेकर कुटुंबिय भारावून गेले. यावेळी पारधी व वरेकर कुटुंबियांनी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आभार मानले.
सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सातत्याने निःस्वार्थीपणे समाजसेवा करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व प्रबोधनात्मक, सामाजिक जागरण उपक्रम गेले पंधरा वर्षे राबविले जातात. तसेच गरजूंना आवश्यक मदत दिली जाते. या संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडीत डॉ डी. बी. खानोलकर रुग्ण सेवा केंद्र चालविले जात असून याचा लाभ आजपर्यंत शेकडो गरजू रुग्णांनी घेतला आहे. आता तेरेखोल नदीच्या महापुरात घरासह व्यवसाय उद्धवस्त झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सिंधुमित्र प्रतिष्ठान पुन्हा एकदा आपला सेवाभाव जपत सामाजिक कार्य निरंतर सुरु ठेवले आहे.