भगवान श्रीकृष्णाची खात्री पटली की सत्राजिताने आपल्यावर लावलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी प्रसेनाचा व स्यमंतकमण्याचा शोध घ्यावा लागेल. त्यामुळे राजा उग्रसेन, पिता वसुदेव व इतर वृद्धांना द्वारकेत ठेवून बाकी सर्व यादवांसह श्रीकृष्ण प्रसेनाचा शोध घ्यायला निघाला. प्रसेन ज्या मार्गाने वनात गेला त्या मार्गाचा मागोवा घेत एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे श्रीकृष्ण निघाला. पुढे हरिणाची पावले मातीत उमटली होती. त्यामागे प्रसेनाच्या घोडय़ाची पावले उमटली होती. त्याचा मागोवा घेत यादव दल दुर्गम जंगलात दूरवर चालले. ते त्या दाट वनात शोध घेत असताना अचानक त्यांना प्रसेनाच्या घोडय़ाचा मृतदेह दृष्टीस पडला. त्याचे अवयव चारी दिशांना विखरून पडले होते. तिथेच त्यांना प्रसेनाची फाटलेली, रक्ताळलेली वस्त्रे दिसली. जवळच प्रसेनाचा मुकुट, धनुष्यबाण, खड्ग, माळा, मुद्रिका, भूषणे अस्ताव्यस्त पडली होती. ती सेवकांनी एकत्र केली. पण त्यांना स्यमंतकमणी त्यात दिसला नाही. त्याचवेळी श्रीकृष्णाला तिथे सिंहाची पावले दिसली.
सिंहपदविन्यासा मान । करूनि चालिएल शोधित रान ।
सामान्य पर्वत उल्लंघोन । केलें आरोहण गिरिपृष्टीं ।
तेथ देखिलें परमाश्चर्य । आस्वलाचे उमटले पाय ।
सिंहप्रेत पडिलें आहे । मणीची सोय न लभेचि ।
पुधें काढिला आस्वलमाग ।कैत चालिले कणीचा लाग । अवघड पर्वत दुर्गम मार्ग । भयंकर दांग प्रवेशले । वृक्ष लागले महाविशाळ । करंज कदंब नीप सरळ ।
खदिर धामोडे अर्जुन बहळ । व्याहळे बाहळे आरग्वध । रिठे ब्याहडे हिरडे कुडे । साय सातवनें दोसाडे ।
दिव्य वृक्शांचे मांदोडे । आम्रचंदनपनसादि ।
राताञ्जन राजादन । ताल तमाल शाल गहन ।
मंदार पार्यातक संतान । मृत्युलोकींचे गिरिभव जे ।
जंबु कपित्थ तिंतिणिका । वैकंकत कर्वंदिका ।
शाल शाल्मली श्लेष्मातका । भल्लातका सहकोळी ।
प्लक्ष पालाश पिंपळ वट । उंबर अंजिर तिंदुक तरट ।
निंब निंबारे सरळ नीट । जाळी अफाट वंशांच्या ।
ऐसे अपार वृक्ष वनीं । उंच विशाळ लागले गगनीं ।
वल्लीलतालिंगिता पर्णीं । सुमनीं वितानीं सफलिता । सिंहाच्या पावलांचा मागोवा घेत यादव सैनिक निघाले. पर्वत ओलांडून ते पलीकडच्या वनात पोहोचले. तिथे त्यांना एक आश्चर्य पहायला मिळाले. सिंहाचे प्रेत पडले होते. तिथे अस्वलाची पावले उमटली होती. पण स्यमंतकमण्याचा थांगपत्ता नव्हता. पुढे त्यांनी अस्वलाच्या पावलांचा माग काढला. अनेक पर्वत ओलांडून ते भयंकर अशा निबिड अरण्यात पोहोचले. या अरण्यातील महाविशाल अशा कदंब, करंज, खदिर, अर्जुन, बहळ, रिठे, ब्याहडे, हिरडे, सातविण, आंबा, चंदन, फणस, ताल, तमाल, शाल, पालाश, पिंपळ, वड, उंबर, अंजिर, निंब अशा अगणित वृक्षराजीचे कृष्णदयार्णवांनी सविस्तर वर्णन केले आहे. या वनात घनदाट वृक्षवल्ली होती. अनेक उंच सरळ वृक्ष होते. दाट झाडी होती व अनेक वेली पसरल्या होत्या. त्यांना अनेक फळे, फुले लागली होती.
Ad. देवदत्त परुळेकर