पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा नारा दिल्यानंतर अनेकांना देशी संशोधनाची प्रेरणा मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील एक कल्पक इंजिनियर कमलेश याने एक असे उपकरण शोधून काढले आहे, की ते कारला बसविल्यानंर चालकाने सीटबेल्ट घातल्याशिवाय कार सुरू होत नाही. आपल्या उपकरणामुळे कार अपघातात जीवीत हानी होण्याचे प्रमाण बरेच कमी होईल असे या इंजिनियरचे प्रतिपादन आहे. आत्मनिर्भरतेच्या घोषणेमुळे आपल्याला हे संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली असे त्याने यासंबंधी बोलताना स्पष्ट केले.
इतकेच नव्हे, तय या डिजिटल उपकरणात कारची चोरी झाल्यास चोराने कार कोठे नेली हेही समजते व अपोआप जवळच्या पोलिस स्थानकात ही माहिती पोहचते. हे उपकरण बनविण्यासाठी त्याने सॅटेलाईट इमेजरी तंत्रज्ञानाचा उपयोग केला असल्याचे सांगितले. तेव्हा कार चालविणे आणि चोरीला गेलेल्या कारचे स्थान (लोकेशन) नेमके कोठे आहे, याची माहिती मालकाप्रमाणे पोलिसांनाही मिळते. अशा प्रकारे कारची आणि चालकाची सुरक्षा या उपकरणामुळे सांभाळली जाते.
या उपकरणाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्याची या इंजिनियरची योजना आहे. त्यासाठी त्याने आर्थिक जुळवाजुळव सुरू केली असून लवकरच उत्पादन बाजारात आणण्याच्या दृषीने हालचाली चालविल्या आहेत.