प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र आणि राज्य सरकार कामगारविरोधी धोरण अवलंबत आहे. केवळ भांडवलशाही आणि विदेशी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशातील कामगार घटकच पूर्ण अडचणीत आला आहे. तेव्हा त्या विरोधात आता 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अंगणवाडी, अक्षरदासोह, मध्यान्ह आहार विभागाच्या महिलांनी सिटूच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून हा इशारा दिला आहे.
केंद्र सरकार हे कामगार आणि शेतकरीविरोधी सरकार आहे. कामगारांना देण्यात येणाऱया सर्व योजना बंद करत आहे. नवीन शिक्षणप्रणाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंगणवाडी बंद करून त्या शिक्षण प्रणालीला रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे. लाखो महिला बेरोजगार होणार आहेत. तेव्हा सरकारने असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे या निवदेनात म्हटले आहे.
शेतकऱयांच्या विरोधातही केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. एपीएमसी कायद्यामध्ये बदल केले आहेत. भूसुधारणा कायदा जाचक आहे. केंद्र सरकारने कामगार आणि शेतकऱयांचा घात केला असून त्या विरोधात आम्ही आता आंदोलन छेडणार आहे. जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून हे निवेदन देण्यात आले. पोलिसांनी मोर्चाला अडवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मोर्चेकऱयांना थांबविले. मात्र आम्हाला जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांना निवेदन द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर जिल्हा पंचायतीवर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष व्ही. पी. कुलकर्णी, सेपेटरी जी. एम. जैनेखान, एल. एस. नायक, जी. व्ही. कुलकर्णी, अंगणवाडी नोकर संघटनेच्या अध्यक्षा दोड्डव्वा पुजेरी, मंदा नेवगी, गोदावरी राजपुरे, चन्नम्मा गडकरी, भारती जोगण्णावर, शांतम्मा गोरवनकोळ्ळ यांच्यासह महिला उपस्थित होत्या.