आमदार जयेश साळगावकर यांची मागणी : नेरुल येथे मेणबत्ती रॅली
प्रतिनिधी /पणजी
सिद्धी नाईक हिचा मृत्यू कसा झाला? हत्या की आत्महत्या? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहेत. सिद्धीला न्याय मिळावा म्हणून नेरुल गावातील महिला आज घराबाहेर पडल्या आहेत. तसेच आज गोव्यात महिला सुरक्षित नाहीत. गेल्या दोन महिन्यात महिलांवरील गुह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई करण्याची मागणी साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी केली.
नेरुल पंचायत ते चर्च दरम्यान सिद्धीला न्याय मिळावा या मागणीसाठी मेणबत्ती रॅली काढण्यात आली. त्यावेळी आमदार साळगावकर बोलत होते. यावेळी गिरी पंच सनी नानोडकर, रेश्मा कळंगूटकर, समीर गडेकर, ऐश्वर्या साळगावकर, रोहन कळंगूटकर, प्रगती पेडणेकर आदींसह मोठय़ा संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
परत अशी घटना राज्यात घडू नये : रेश्मा कळंगूटकर
नेरुल सरपंच रेश्मा कळंगूटकर म्हणाल्या, सिद्धीवर अन्याय झाला आहे. तिला न्याय मिळेपर्यंत महिलांनी गप्प बसता कामा नये. कारण अशा घटना पुन्हा राज्यात घडता कामा नयेत. ही जबाबदारी आपलीच आहे. सिद्धीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही झटूया, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सर्तक करावे : समीर गडेकर
हळदोण येथील समीर गडेकर म्हणाले, गेल्या दोन महिन्यात राज्यात महिलांवरी अत्याचारात वाढ झाली आहे. मुख्यमंत्री मुलींनी रात्री बाहेर फिरु नये असे म्हणतात मात्र सिद्धी सकाळी गायब झाली. मग आता मुलींनी सकाळी पण बाहेर पडायचे नाही का? मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सर्तक केले पाहिजे. त्यांनी योग्यवेळी केस नोंद करुन तपास केला असता तर परिस्थिती वेगळी असती असे ते म्हणाले.
गस्तीवरील पोलीस काय करतात? : ऐश्वर्या साळगावकर
ऐश्वर्या साळगावकर म्हणाल्या की, समुद किनारी मृतदेह आढळून येतात मग गस्तीवरील पोलीस करता तरी काय? याची चौकशी व्हायला पाहिजे. गाडय़ांचे आरसे काळे असतात त्यांच्यावर कारवाई का नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
सर्व पंचायतींनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा
गिरी पंचायतीचे सदस्य सनी नानोडकर म्हणाले, सरकारने सिद्धीला न्याय द्यावा. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आपले कार्य सिद्ध करावे. सर्व पंचायतींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, अशी मागणी त्यांनी केली.
त्वरित सिद्धी व तिच्या कुटुंबियांना न्याय द्या
रोहन कळंगूटकर म्हणाले, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या कसेमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला असून त्वरित सिद्धीला व तिच्या कुटुंबियांना न्याय द्यावा. ही आत्महत्या नाही, उगाच सिद्धीची व कुटुंबियांची बदनामी करु नका, असेही ते म्हणाले.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचला
प्रगती पेडणेकर म्हणाल्या, आज महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने पोलीस बळ वाढवतानाच प्रमुख ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.