पंजाबमध्ये काँग्रेसला एकापाठोपाठ एक ‘धक्के’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे कन्हैया-जिग्नेश यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसच्या गोटात आनंदमय वातावरण असतानाच पंजाबमधील नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी अचानक राजीनामा देत टाकलेल्या ‘गुगली’मुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘दांडी गुल’ झाली आहे. सिद्धू यांच्यापाठोपाठ पंजाब काँग्रेसमधील आणखी दोन मंत्र्यांनीही राजीनामे देत काँग्रेसला ‘धक्क्यापाठोपाठ धक्के’ दिले. पंजाबमधील या घडामोडींनंतर दिल्लीतील मुख्यालयात अगदी ‘सामसूम’ वातावरण दिसून येत होते. तसेच यानिमित्ताने पक्षनेते आणि नेतृत्त्व यांच्यातील मतभेदही ‘सीमापार’ (चव्हाटय़ावर) आले आहेत.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर पक्षात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मंगळवारी दुपारनंतर प्रचंड गोंधळ सुरू होता. बिहारमधून कन्हैया कुमार आणि गुजरातमधून जिग्नेश मेवाणी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. या दोघांनाही काँग्रेसमध्ये समाविष्ट करण्यासाठी राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालय गाठले, पण जेव्हा दोघांनाही काँग्रेसमध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद सुरू झाली, तेव्हा राहुल गांधी पोहोचले नाहीत. तत्पूर्वी, राहुल गांधींना नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यासंबंधी विचारणा केली असताही ते काहीही न बोलता पुढे गेले. एकंदर दिवसभरातील या घटना-घडामोडींमुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले.
पत्रकार परिषदेची वेळ तीनवेळा लांबली
कन्हैया-जिग्नेश यांच्या पक्षप्रवेशानंतर दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात होणाऱया पत्रकार परिषदेची वेळ तीनवेळा बदलण्यात आली. सुरुवातीला दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेण्याचे सांगण्यात आले होते. सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याची वेळ बदलून सायंकाळी 4.30 करण्यात आली. त्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा परिषदेची वेळ बदलली. शेवटी पत्रकार परिषद सायंकाळी 5.20 वाजता सुरू झाली. मात्र या पत्रकार परिषदेत राहुल गांधी उपस्थित नव्हते. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकारांना संबोधित केले. तसेच पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना पक्षात प्रवेश दिल्याची घोषणा केली.
सिद्धू यांचा राजीनामा हायकमांडकडून नामंजूर
समर्थनार्थ पंजाबमधील कॅबिनेट मंत्र्याचेही राजीनामास्त्र
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या गळय़ात घातल्यानंतर मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी अचानकपणे नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्विट करत हा राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यांनी आपला राजीनामा सोनिया गांधींकडे पाठवला आहे. या राजीनाम्यामध्ये आपण केवळ प्रदेशाध्यक्षपद सोडत असून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, रात्री उशिराने प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांचा राजीनामा नामंजूर झाला असून हायकमांडने राज्य पातळीवर हा विषय मिटविण्याची सूचना केली आहे. तथापि, त्यांच्या या राजीनाम्यानंतर पंजाब मंत्रिमंडळामध्येही बंडाळी दिसून आली. सिद्धूंच्या समर्थनार्थ दोनच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री रझिया सुलताना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.