निवडणूक तोंडावर आलेली असताना सख्ख्या बहिणीने केलेल्या आरोपांमुळे प्रचंड खळबळ
पंजाब विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन आठवडय़ांवर आलेली असताना काँगेसचे नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे इच्छुक नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची सख्खी बहीण असणाऱया सुमन तूर यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तूर या अनिवासी भारतीय आहेत.
नवज्योतसिंग सिद्धू अत्यंत क्रूर आहेत. त्यांनी आपल्या वृद्ध आणि असहाय्य आईला घराबाहेर काढले. त्यामुळे आईचा अनाथ महिलेसारखा दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर मृत्यू झाला. ही 1986 ची घटना आहे. त्यावेळी सिद्धू राजकारणात नव्हते. सिद्धूना पैशाचा अनावर मोह असून त्यासाठीच त्यानी प्रत्यक्ष आईलाही घराबाहेर काढावयास मागे पुढे पाहिले नाही. आईचा मृत्यू 1989 मध्ये झाला, असा आरोप तूर यांनी शुक्रवारी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
पार्श्वभूमी तयार केली
आईला घराबाहेर काढण्यापूर्वी सिद्धूने एक लेख लिहिला होता. त्यात, आईवडील एकमेकांपासून विभक्त झाल्याचे धादांत असत्य विधान करण्यात आले होते. प्रत्यक्षात तशी स्थिती नव्हती. सिद्धूलाच आईचे घरातील अस्तित्व खुपत होते. त्यामुळे तिला घराबाहेर काढण्यासाठी त्यानेच हा बनाव रचून पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न केला होता, असाही दावा तूर यांनी केला.
अद्याप प्रतिक्रिया नाही
बहिणीच्या या गंभीर आरोपांवर नवज्योत सिद्धू यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण त्यांच्या मौनामुळे आरोप खरे आहेत अशी लोकांची समजूत होण्याची शक्यता असून त्याचा फटका सिद्धूंना आणि काँग्रेसला बसू शकतो, अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकंदरीत, ही विधानसभा निवडणूक काँगेससाठी कसोटीची ठरणार, असेच सर्व संकेत आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार
काँगेस पंजाबमधील निवडणूक मुख्यमंत्रिपदाचा चेहरा लोकांसमोर ठेवूनच लढणार आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. तळागाळात कार्य करणाऱया कार्यकर्त्यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारावर मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड केली जाईल आणि ती लोकांना सांगितली जाईल, असे राहुल गांधींनी ठरविल्याचे सूत्रांच्या माहितीवरुन कळते. मुख्यमंत्री कोण हे आधी ठरवा, असा आग्रह नवज्योतसिंग सिद्धू यांनीच धरला होता. नंतर विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनीही पक्षश्रेष्ठींकडे तसाच सूर लावला होता.