प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाचे कुंभारजुवे मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांची नाराजी दूर झाली असून पक्षाने त्यांना गोवा प्रदेश भाजपचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. पणजी येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर व सिद्धेश नाईक उपस्थित होते.
भाजपा हा देश प्रथम आणि पक्ष प्रथम या तत्त्वावर चालणारा पक्ष असून भाजपाचे नेते कधीच स्वहिताचा विचार करत नसतात. त्यामुळे पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यासोबत राहणे महत्त्वाचे असते. माजी मंत्री दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, जि. पं. सदस्य गिरीश उस्कैकर, नावेलीतील सत्यविजय नाईक आदी अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसतानाही ते पक्षासोबत राहिले आहेत. त्यामुळे आपण पक्षातर्फे आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
सिद्धेशची उमेदवारीची अपेक्षा योग्यच
सिद्धेश नाईक यांनी तळागाळात भाजपसाठी काम केलेले आहे. विद्यार्थी परिषदेपासून ते युवा मोर्चाचे सरचिटणीस, कुंभारजुवे भाजपा मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अशा अनेक पदावर त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागणे स्वाभाविक आहे. 2017 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी देण्याबाबत विचार व्यक्त केला आणि सिद्धेश नाईक यांनी त्याला पाठिंबा दिला होता. यावेळीही त्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली होती आणि ती योग्यच होती. कारण ते जिल्हा पंचायत सदस्य आहेत आणि अनेक वर्षे पक्षाचे काम आहे करत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक समितीने जुने गोवेच्या सरपंच जनिता मडकईकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सिद्धेश नाईक नाराज होणे सहाजिकच होते. मात्र त्यांनी पक्ष सोडला नाही की बंडखोरीही केलेली नाही. पक्षासोबत राहणे पसंत केले आणि या परीक्षेमध्ये ते पास झालेले आहेत, तानावडे म्हणाले.
श्रीपादभाऊंनी पक्ष, राज्य, देशाचे हित पाहिले
पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी दाखल करणे यात मोठेपणा नाही तर पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यासोबत राहणे हा मोठेपणा आहे. केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांनीही कधीही आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील नेत्यांवर किंवा केंद्रातील नेत्यांवर दबाव टाकलेला नाही, ते पक्षाचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी नेहमीच पक्षाचे हित आणि देशाचे हित याचा विचार केलेला आहे.
भाजपच्या सर्वच उमेदवारानी अर्ज भरलेले असून पहिल्यांदाच भाजपने चाळीसही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. भाजप निवडणुकीसाठी पूर्ण सज्ज असून येत्या निवडणुकीत नक्कीच पुन्हा एकदा भाजपाचे सरकार गोव्यात सत्तेवर येणार आहे, असेही तानावडे म्हणाले.
पक्षाने घेतलेला निर्णय आपण मान्य केलेला असून आपणाकडे वास्को मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपण तेथे निवडणुकीचे काम करणार आहे, असे सिद्धेश नाईक यांनी यावेळी सांगितले. आपण जरी वास्कोमध्ये निवडणुकीच्या काळात काम करत राहिलो तरी, आपले समर्थक कुंभारजुवे मतदारसंघात पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासाठीच काम करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.