कोल्हापुरातील सर्व पक्ष, संघटनांसह नागरिकांचा एकजुटीने निर्धार
प्रतिनिधी / कोल्हापूर
गेली पासष्ट वर्षे कर्नाटक सरकारच्या जुलमी सत्तेविरोधात लोकशाही मार्गाने लढा देत महाराष्ट्रात येण्यासाठी धडपड करणाऱ्या सिमाबांधवांच्या लढ्याला सलाम करत शनिवारी तमाम कोल्हापूरवासीयांनी सिमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत सिमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सर्व राजकीय पक्षांसह विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी येथील ऐतिहासिक दसरा चौकातील धरणे सत्याग्रह आंदोलनाला भेट देवून सिमाबांधवांच्या लढ्याला पाठबळ दिले. यावेळी रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, खानापूर, निपाणी, बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी संपूर्ण दसरा चौक दणाणून गेला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने येथील ऐतिहासिक दसरा चौकात शनिवारी धरणे सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खानापूर, बेळगावसह सिमाभागातील विविध गावातील कार्यकर्ते मोठया संख्येने कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला कोल्हापूरवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभला.
दसरा चौकातील भव्य मंडपात शनिवारी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलनाला सुरूवात झाली. सिमा लढ्यातील पहिले सत्याग्रही पुंडलिकमामा चव्हाण, नारायण लाड, नारायण पाटील, शंकरराव पाटील, दे. भ. उर्फ देवाप्पा घाडी गुरूजी यांच्या हस्ते हुतातात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, शहराध्यक्ष विवेक गिरी, समिती नेते प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, महादेव घाडी, आबासाहेब दळवी, नारायण कार्वेकर, जयराम देसाई, लक्ष्मण कसर्लेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे सरचिटणीस किरण गावडे, बेळगाव तालुका सरचिटणीस मनोज पावशे, बेळगावच्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, नगरसेवक रवि साळोखे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सिमाबांधवांनी मांडल्या व्यथा
धरणे आंदोलनाच्या निमित्ताने सिमाबांधवांनी कर्नाटक सरकारकडून गेली 65 वर्षे मराठी भाषिकांना संपविण्यासाठी केलेल्या जुलूमी अत्याचारांचा पाढाच मांडला. सिमाभागातील मराठी भाषा, संस्कृती, मराठी शाळा संपविण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही समितीच्या नेते आणि पदाधिकाऱयांनी केला. कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विधानसौधची उभारणी करून त्या परिसरात कन्नड अधिकाऱयांच्या वसाहती वसविल्या आहेत. मराठी टक्का कमी करून कानडी टक्का वाढविण्याचे योजनाबद्ध कारणस्थान सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. 65 वर्षे लढा देत असताना आजवर हा प्रश्न सुटलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरही समाधानकारक प्रगती झालेली नाही. या सर्व गोष्टींचा कर्नाटकातील सरकार फायद घेत मराठी भाषिकांना चिरडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येण्यासाठी आसुसलेल्या आणि चार पाच पिढ्यांनी त्याग आणि हौतात्म्य दिलेल्या मराठी बांधवांच्या हक्काच्या मागणीसाठी पाठबळ द्या, असे कळकळीचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सिमाबांधवांच्या आंदोलनाला कोल्हापूरवासीयांचे बळ
सत्याचा आग्रह धरत सुरू झालेल्या धरणे आंदोलनात कोल्हापुरातील सर्व राजकीय पक्ष, संस्था, संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेऊन यापुढेही सिमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत तमाम कोल्हापूरवासीय आपल्या पाठिशी राहतील, असा निर्धार व्यक्त केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, कार्याध्यक्ष अनिल कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, संजय पवार-वाईकर, भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश कार्यकारी सदस्य महेश जाधव, महिला आघाडी प्रमुख गायत्री राऊत, विजयसिंह खाडे-पाटील, विवेक वोरा, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, मराठा संघटनचे चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, पै. बाबा महाडिक, मराठा शौर्यपीठचे प्रसाद जाधव, उदय लाड, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, भाकपचे सतीश्चंद्र कांबळे, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशचे अध्यक्ष ऍड. रणजित गावडे, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, कोल्हापूर मावळाचे उमेश पोवार, विनोद साळोखे, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळोखे, अनिसच्या सिमा पाटील, शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन सिमाबांधवांच्या या सत्याग्रहाला जाहीर पाठिंबा दिला. सर्व पक्षीय बळ
|
कोण काय म्हणाले
राजेश क्षीरसागर : सिमालढ्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेने पाठिंबा आणि बळ दिले. यापुढेही आमचा पाठिंबा आणि सहकार्य राहिल. सिमाबांधवांची सिमाभागात प्रचंड ताकद आहे, ती विभागली जावू नये, पूर्वीप्रमाणे एकजुटीने हा लढा आपण सर्व जण मिळून लढुया.
आमदार चंद्रकांत जाधव : राजकारण करायचे आणि सिमाप्रश्न रेंगाळत ठेवायचा हे धोरण आजवर नेहमीचेच राहिले आहे. 1993 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढलेल्या तोडग्यावर पुन्हा चर्चा होऊन कायम स्वरूपी सिमाप्रश्न सोडविण्याची गरज आहे. त्यासाठी मी सिमाबांधवांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर लवकरच भेट घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
माजी आमदार चंद्रदीप नरके : सिमालढा हा देशातील सर्वात मोठा लोकशाही मार्गाने सुरू असलेला दीर्घकालीन अखंडीत लढा आहे. सिमाबांधवांवर होणाऱया अन्यायाची कोल्हापूर आणि महाराष्ट्राला जाणीव आहे. शिवसेनाही आजवर कायम सिमाबांधवांच्या मागे राहिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही हा प्रश्न सुटावा, अशी इच्छा होती. त्याच मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही आहेत. सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या दाव्याला गती मिळावी, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सुटावा यासाठी शिवसेना आणि कोल्हापूरवासीय सिमाबांधवांच्या शेवटपर्यंत पाठिशी राहतील.
पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी बळ द्यावे : दिगंबर पाटील
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी या धरणे आंदोलनात केलेल्या प्रमुख मागणीची माहिती दिली. ते म्हणाले, सिमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रारंभी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार, आमदार यांनी पुढाकार घ्यावा, एकजुटीने कृती समिती स्थापन करावी आणि या समितीच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करावा. तसेच शरद पवार यांच्या तोडग्याचाही सकारात्मक विचार करण्यात यावा.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख मागण्या
1) महाराष्ट्र शासनाने कागल (जि. कोल्हापूर) येथे महाराष्ट्र विधानभवन बांधावे आणि दरवर्षी पावसाळी किंवा हिवाळी अधिवेशन तेथेच घ्यावे. त्यामुळे सीमाभागातील लोकांना महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे याचे समाधान वाटेल.
2) कोल्हापूर जिह्यातील गडहिंग्लज येथे वैद्यकीय महाविद्यालय व सुसज्ज हॉस्पिटल उभे करावे. त्यामुळे सीमाभागातील लोकांना वैद्यकीय मदत व दिलासा मिळेल.
3) चंदगडपासून शिनोळीपर्यंत व पुढे तिलारीपर्यंत फूडपार्क उभे करावेत. तसेच सेव्हन स्टार एमआयडीसी उभी केली जावी. त्यामुळे सीमाभागातील मराठी लोकांना रोजगार उपलब्ध होईल व ते बेळगावतच राहतील.
4) सांगली येथे टेक्निकल युनिव्हरसिटी व्हावी. आयटी पार्क स्थापन केले जावे.
5) बिदर जिह्याजवळील उदगीर येथे विद्यापीठाची स्थापना करून त्यास शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते उद्धवराव पाटील यांचे नाव दिले जावे.